आठवडी बाजारांमध्ये ८०१ कोटींची उलाढाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 02:46 IST2018-10-28T02:46:02+5:302018-10-28T02:46:26+5:30
शेतकऱ्यांचा माल मध्यस्थांविना थेट ग्राहकाच्या दारात

आठवडी बाजारांमध्ये ८०१ कोटींची उलाढाल
- गौरीशंकर घाळे
मुंबई : पुण्यात कोथरूड येथे २०१४ साली सुरू झालेल्या आठवडी बाजाराच्या प्रयोगाने चांगलीच गती घेतली असून चार वर्षांत ८०१ कोटींच्या घरात उलाढाल पोहोचली आहे. कोणत्याही मध्यस्थाविना राज्यात सध्या ११० आठवडी बाजार सुरू आहेत.
भाजीपाला आणि फळे नियंत्रण मुक्त केल्यानंतर राज्य सरकारने आठवडी बाजारांना प्रोत्साहन देण्याची भूमिका स्वीकारली. मुंबई, पुण्यासारख्या महानगरांत गृहनिर्माण सोसायट्या, विविध ठिकाणच्या मोकळ्या जागेत आठवडी बाजार भरत आहेत.
थेट शिवारातून शहरी माणसाच्या दारात भाजीपाला येत आहे. मुंबईत १६, ठाण्यात ९, नवी मुंबईत ६ आठवडी बाजार भरतात. सर्वाधिक ६६ आठवडी बाजार पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये आहेत. नागपुरात ६ तर औरंगाबाद आणि सोलापुरात प्रत्येकी तीन आठवडी बाजार भरतात.
भाजीपाला उत्पादक शेतकरी आणि सामान्य ग्राहक दोघांकडून आठवडी बाजाराची मागणी वाढत आहे. स्थानिक स्वराज संस्था आणि विविध शाळांसोबतही नवीन आठवडी बाजारासाठी चर्चा सुरू आहे. सुटीच्या दिवशीच आठवडी बाजार भरतो, त्यामुळे नियमित शाळांना अडचण होणार नाही.
- दीपक तावरे, संचालक, पणन