नापास झालेले ४२ टक्के विद्यार्थी झाले पास; पदवी अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका तपासणीवर प्रश्नचिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 09:04 IST2025-07-26T09:03:47+5:302025-07-26T09:04:08+5:30
मुंबई विद्यापीठाच्या २०२५ मधील उन्हाळी सत्राच्या तृतीय वर्ष सेमिस्टर ६ परीक्षेच्या पुनर्मूल्यांकनात केवळ ४२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

नापास झालेले ४२ टक्के विद्यार्थी झाले पास; पदवी अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका तपासणीवर प्रश्नचिन्ह
मुंबई : मुंबईविद्यापीठाच्या २०२५ मधील उन्हाळी सत्राच्या तृतीय वर्ष सेमिस्टर ६ परीक्षेच्या पुनर्मूल्यांकनात केवळ ४२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केलेल्या १२,६४२ पैकी ५,३७० विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने उत्तरपत्रिका तपासणीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यामुळे विद्यापीठातील आणि संलग्न महाविद्यालयांतील प्राध्यापकांनी उत्तरपत्रिकांची योग्यरीतीने तपासणी केली नव्हती का, सवाल उपस्थित केला जात आहे.
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील गोंधळ अद्यापही संपलेला नाही. कारण पुर्वी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करणाऱ्यांपैकी सरासरी १० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण होत होते. मात्र, आता हे प्रमाण ४० ते ५० टक्क्यांपर्यंत
पोहोचले आहे.
तब्बल ९१६ म्हणजेच ७० टक्के
विद्यापीठाच्या हिवाळी सत्र २०२४ मधील टीवायबीएच्या ५व्या सेमिस्टरच्या १३०८ विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केले होते. त्यापैकी तब्बल ९१६ म्हणजेच ७० टक्के एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्याचवर्षी टीवाय बी.कॉम अभ्यासक्रमाच्या तब्बल ११,१८१ विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केले. त्यातही ४,१७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नुकत्याच पार पडलेल्या उन्हाळी सत्र २०२५ मधील परीक्षेत टीवाय बी.कॉम.च्या १०,३९६ विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केले होते, त्यातील ४,३९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती विद्यापीठाच्या कागदपत्रांवरून समोर आली आहे.
पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करणाऱ्यांपैकी सरासरी १० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण होतात. मात्र, आता हे प्रमाण ४० ते ५० टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने एवढे विद्यार्थी उत्तीर्ण होत असल्यास उत्तरपत्रिका तपासणारी यंत्रणा अकार्यक्षम आहे का? बिगर अनुभवी लोक उत्तरपत्रिकांची तपासणी करतात का? असा प्रश्न एका कॉलेजच्या प्राध्यापकाने नाव न छापण्याच्या उपस्थित केला आहे. पुनर्मूल्यांकनात निकालात २० ते २५ गुणांपर्यंत वाढ झाल्याचे दिसून आले असून, एवढी तफावत कशी काय असून शकते, असेही त्यांनी म्हटले आहे.
हिवाळी सत्र २०२४
सत्रनिहाय पुनर्मूल्यांकन अर्ज आणि उत्तीर्णांची संख्या
शाखा अर्ज (सत्र ५) उत्तीर्ण अर्ज (सत्र ६) उत्तीर्ण
टीवाय बीए १३०८ ९१६ १२८ ६३
टीवाय बीकॉम ११,१८१ ४१७७ १३४८ ३५२
टीवाय बीएससी ९५३ ३८४ ४५६ १११
उन्हाळी सत्र २०२५
शाखा अर्ज (सत्र ५) उत्तीर्ण अर्ज (सत्र ६) उत्तीर्ण
टीवायबीए १५३ १०६ १,३२१ ५६६
टीवायबीकॉम ३,२८५ १,०८३ १०,३९६ ४,३९४
टीवायबीएससी २७७ १२५ ९२५ ४१०
पुनर्मूल्यांकनासाठी घेतलेले शुल्क परत करा
विद्यापीठाचा परीक्षा विभाग याला जबाबदार असून, चुकीचे मूल्यांकन करणाऱ्यांवर कारवाई व्हावी. विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये बदल झाल्यास विद्यापीठाने पुनर्मूल्यांकनासाठी घेतलेली संपूर्ण रक्कम परत करावी, अशी मागणी युवा सेनेच्या सिनेट सदस्य शीतल शेठ देवरुखकर यांनी केली.