मुंबईत तीन दशकांत दरडींनी गिळले ३१० जीव!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 13:05 IST2023-07-21T13:05:12+5:302023-07-21T13:05:45+5:30
या पार्श्वभूमीवर पालिकेने अद्यापही सर्व ठिकाणी संरक्षक भिंती बांधल्या नाहीत. शिवाय उपाययोजना करण्यासाठी आराखडाही पालिकेकडे तयार नसल्याचा दावा केला जात आहे

मुंबईत तीन दशकांत दरडींनी गिळले ३१० जीव!
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : यंदा पालिकेने दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या २४९ ठिकाणांचे सर्वेक्षण केले आहे. त्यापैकी ७४ ठिकाणे धोकादायक स्थितीत आहेत, तर ४५ ठिकाणे अतिधोकादायक असल्याचे जाहीर केले. अशा परिस्थितीत मागील ३१ वर्षांत दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३१० लोकांचा मृत्यू झाला, तर ३०० हून अधिक नागरिक जखमी झाले.
या पार्श्वभूमीवर पालिकेने अद्यापही सर्व ठिकाणी संरक्षक भिंती बांधल्या नाहीत. शिवाय उपाययोजना करण्यासाठी आराखडाही पालिकेकडे तयार नसल्याचा दावा केला जात आहे. २०११ साली मुंबईतील ३६ पैकी २५ मतदारसंघांत डोंगराळ भागातील २५७ ठिकाणे धोकादायक म्हणून जाहीर केल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सांगितले. या भागातील २२,४८३ झोपड्यांपैकी ९,६५७ झोपड्यांना प्राधान्याने स्थानांतरित करण्याची शिफारस मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने राज्य शासनाला केली होती. यात उर्वरित झोपड्यांना टेकड्यांच्या आजूबाजूला तटबंदी बनवून संरक्षित करण्याचेही प्रस्तावित केले होते.
शहरात दरड कोसळण्याची भीती कुठे?
मलबार हिल, ताडदेव, वरळी, ॲण्टॉप हिल, घाटकोपर, असल्फा गाव, विक्रोळी सूर्यनगर, चेंबूर वाशी नाका, भांडुप, चुनाभट्टी, कसाई वाडा आदी ठिकाणच्या दरडीखाली काही कच्ची, तर काही पक्की बांधकामे आहेत.