मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत पात्र आणि अपात्रतेच्या मुद्यांवरून वाद सुरू असतानाच पहिली यादी जाहीर झाली आहे. त्यात २८७ तळमजल्यावरील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र झाली आहेत. तर अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत पुरावे सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्पाकडे रेल्वेमार्गानलगतच्या सेक्टर एकमधील मेघवाडी, गणेशनगरमधील ५०५ रहिवाशांची यादी आली होती. यातील २८७ बांधकामे तळमजल्यावरची आहेत. यातील ३० ते ४० बांधकामे शौचालये किंवा सार्वजनिक सुविधांमध्ये मोडत आहेत. उर्वरित २४९ बांधकामे होती. त्यातील १६१ बांधकामे पात्र झाली आहेत.
आता केवळ मसुदा लावण्यात आला आहे. यावर लोकांना हरकती असतील तर त्यांना ५ जुलैपर्यंत आपले म्हणणे मांडता येईल. ज्यांचे पुरावे धारावी पुनर्विकास प्रकल्पाकडे आलेले नाहीत; त्यांना नव्याने पुरावे देता येतील. त्यानंतर अंतिम यादी प्रसिद्ध होईल.
तक्रारींच्या निराकरणासाठी तक्रार निवारण प्रणाली उभारण्यात येत आहे. एखाद्याचे नाव परिशिष्ट दोनमध्ये चुकीने वगळले गेले आहे किंवा सर्वेक्षणात काही चूक झाली आहे, तर त्याला न्याय मिळेल. धावपळ न होता त्यांच्या तक्रारींचे एक खिडकी प्रणालीद्वारे निवारण केले जाईल.
आपण पात्र-अपात्र अशा दोन्ही लोकांना घर देत आहोत. फक्त पात्र असेल तर धारावीत आणि अपात्र असेल तर धारावीबाहेर घर मिळेल. अपात्र लोकांचे म्हणणे आहे की, आम्हाला आम्हाला येथेच घर द्या. मात्र, असे होत नाही. -एस.व्ही.आर. श्रीनिवास, मुख्य कार्यकारी अधिकारी, धारावी पुनर्विकास प्रकल्प