१२ डब्यांच्या १६ लोकल आता १५ डब्यांच्या; प्रवाशांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 13:55 IST2026-03-18T13:55:05+5:302026-03-18T13:55:26+5:30
मुंबई : उपनगरी रेल्वेतील वाढती प्रवासी गर्दी आणि लोकलमधून पडून होणारे अपघात लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने १२ डब्यांच्या १६ ...

१२ डब्यांच्या १६ लोकल आता १५ डब्यांच्या; प्रवाशांना दिलासा
मुंबई : उपनगरी रेल्वेतील वाढती प्रवासी गर्दी आणि लोकलमधून पडून होणारे अपघात लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने १२ डब्यांच्या १६ लोकलगाड्या १५ डब्यांच्या करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. १९ मार्च २०२६ पासून या १५ डब्यांच्या लोकल धावतील. या निर्णयामुळे प्रत्येक फेरीतील प्रवासी क्षमता वाढणार असून, गर्दी कमी करण्यास मदत होणार आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बदलानंतर १५ डब्यांच्या लोकल सेवांची एकूण संख्या २११ वरून २२७ इतकी होणार आहे. मात्र, उपनगरी लोकल गाड्यांची एकूण संख्या १४१४ इतकीच कायम राहणार असून, नव्या गाड्या वाढवण्याऐवजी गाड्यांची क्षमता वाढवण्यावर भर देण्यात आला आहे.
गर्दीच्या वेळी गाड्यांचे नियोजन...
१५ डब्यांच्या या १६ सेवांपैकी ८ सेवा गर्दीच्या वेळेत चालवण्यात येतील. त्यामध्ये सकाळी ४ आणि सायंकाळी ४ गाड्यांचा समावेश असेल. उर्वरित ८ गाड्या कमी गर्दी असलेल्या वेळेत धावतील. १५ डब्यांच्या लोकलमुळे एका फेरीत अंदाजे २५ टक्क्यांपर्यंत अधिक प्रवासी वाहतूक शक्य होणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.