मुंबई : महाराष्ट्रपोलिस दलात शिपायांची सुमारे १५ हजार ६३१ पदे भरण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी २०२४-२५ च्या पोलिस शिपाई भरती प्रक्रियेस बैठकीत मान्यता देण्यात आली. या भरतीमध्ये २०२२ व २०२३ मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे. पोलिस शिपाई व कारागृह शिपाई ही पदे गट - क संवर्गातील आहेत.
राज्य पोलिस दलात २०२४ दरम्यान रिक्त असलेली व २०२५ मध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन, ही भरती करण्यात येणार आहे. पोलिस शिपाई भरती प्रक्रिया त्या-त्या जिल्हा स्तरावरून राबविण्यात येते. त्यासाठी ओएमआर आधारित लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे, त्यासाठी आनुषांगिक प्रक्रिया राबवण्यास बैठकीत मान्यता दिली.
पुण्यातील नव्या पोलिस ठाण्यांसाठीही भरती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात पाच नवी पोलिस ठाणी उभारण्याची घोषणा केली आहे. या नवीन ठाण्यांना लागणाऱ्या शिपायांचाही या भरतीत समावेश आहे.
पोलिस दल व कारागृहातील स्थिती सुधारण्यासाठी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयानेही वेळोवेळी ही पदे वेळेत भरली जावीत असे निर्देश दिले आहेत.
राज्यात एक लाख ९८ हजार ८७० पोलिस आहेत. म्हणजेच एक लाख लोकसंख्येमागे १७२ पोलिस आहेत.
मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो. मागील पाच वर्षांमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना व देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून २०२१-२२ ला १७,००० तर २०२२-२३ ला १८,००० पोलिस शिपायांची भरती केली. आता पुन्हा एकदा १५,६३१ पोलिसांची पदे भरली जाणार आहेत - योगेश कदम, गृह राज्यमंत्री