राज्यात १३४० कोटींचा जलसंवर्धन कार्यक्रम लवकरच घोषणा; एक लाख ६६ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 07:57 IST2021-02-04T07:56:55+5:302021-02-04T07:57:16+5:30
water conservation : राज्यातील ६०० हेक्टरपर्यंत क्षमतेच्या सिंचन प्रकल्प तलावांची १३४० कोटी खर्च करून दुरुस्ती करण्यात येईल.

राज्यात १३४० कोटींचा जलसंवर्धन कार्यक्रम लवकरच घोषणा; एक लाख ६६ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार
मुंबई : राज्यातील ६०० हेक्टरपर्यंत क्षमतेच्या सिंचन प्रकल्प तलावांची १३४० कोटी खर्च करून दुरुस्ती करण्यात येईल. त्याद्वारे एक लाख ६६ हजार हेक्टर इतकी सिंचनक्षमता पुनर्स्थापित करण्यात येईल. त्यासाठीच्या मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रमाची घोषणा लवकरच करण्यात येईल.
जलसंधारण विभागाने हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आखला आहे. या कार्यक्रमांतर्गत ७९१६ जलस्रोतांची दुरुस्ती करण्यात येईल. मार्च २०२३पर्यंत हा कार्यक्रम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. दुरुस्तीनंतर पाणीवापर संस्था तयार करून त्यांच्याकडे देखभालीचे काम देण्यात येईल.
लघुसिंचन तलाव, मालगुजारी तलाव, साठवण तलाव, गावतलाव, पाझर तलाव, सिमेंट बंधारे, कोल्हापुरी बंधारे, आदींची विशेष दुरुस्ती या कार्यक्रमांतर्गत करण्यात येणार आहे.