HSC Result: बारावीच्या निकालात १०.४४ % वाढ, मुंबई विभागाचा निकाल ९९. ७९ %
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 09:17 IST2021-08-04T09:17:26+5:302021-08-04T09:17:58+5:30
HSC Result: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या निकालात मुंबई विभागीय मंडळाच्या निकालात यंदा तब्बल १०.४४ टक्क्यांची वाढ झाली आहे.

HSC Result: बारावीच्या निकालात १०.४४ % वाढ, मुंबई विभागाचा निकाल ९९. ७९ %
मुंबई : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या निकालात मुंबई विभागीय मंडळाच्या निकालात यंदा तब्बल १०.४४ टक्क्यांची वाढ झाली आहे. विभागीय मंडळाच्या निकालात मुंबई विभाग राज्यात दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबई विभागीय मंडळाचा यंदाचा निकाल ९९.७९ % लागला असून मागील वर्षी तो ८९. ३५ % इतका होता.
मुंबई विभागातून यंदा २ लाख ९४ हजार ०९० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ही २ लाख ९३ हजार ४७९ इतकी आहे. यातील १ लाख ३४ हजार ६७५ विद्यार्थ्यांना प्रावीण्यासह प्रथम श्रेणी म्हणजेच डिस्टिंक्शन मिळाले आहे.
यंदा बारावीच्या निकालात वाणिज्य शाखेचा निकाल हा सर्वाधिक म्हणजे ९९. ९० % इतका लागला आहे. मागील वर्षी वाणिज्य शाखेचा निकाल ८८. ८८ % इतका होता, त्यात तब्बल ११ टक्क्यांची वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती वाणिज्य शाखेला असल्याने प्रवेशासाठीची स्पर्धा कठीण असणार असल्याचे मत वाणिज्य विषयाचे प्राध्यापक व्यक्त करीत आहेत. कला शाखेचा निकाल ९९. ७८ % इतका लागला आहे. कला शाखेच्या निकालात झालेली वाढ ही १९. ३७ टक्क्यांची असून ही सर्वाधिक वाढ आहे. विज्ञान शाखेचा निकाल ९९. ५८ % इतका लागला असून यात मागीलवर्षीपेक्षा ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागीलवर्षी विज्ञान शाखेचा निकाल ९५.१६ % होता. किमान कौशल्य (एचएसव्हीसी) शाखेचा निकाल ९९.४८ % इतका आहे.
ठाण्याची बाजी, पालघर मागे
मुंबई विभागाचा जिल्हानिहाय निकाल पाहता ठाण्याचा निकाल सर्वाधिक ९९. ८७% लागला आहे. त्याखालोखाल बृहन्मुंबईचा निकाल ९९. ८४% लागला. मुंबई विभागात तिसऱ्या स्थानावर रायगड आणि मुंबई उपनगर-२ हे जिल्हे असून त्यांचा निकाल ९९. ८१% इतका -वृत्त/६
आहे. सर्वाधिक कमी निकाल पालघर जिल्ह्याचा असून तो ९९. ५२ % इतका आहे. ९९. ७९ % टक्क्यांसह मुंबई उपनगर -१ जिल्हा चौथ्या स्थानावर आहे.
मुंबई विभागातून ४५ टक्के विद्यार्थ्यांना डिस्टिंक्शन
मुंबई विभागातून बारावी परीक्षेला बसलेल्या सर्व शाखांच्या एकूण ४५ % विद्यार्थ्यांना यंदाच्या निकालात डिस्टिंक्शन मिळाले आहे. २ लाख ९३ हजार ४७९ उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये तब्बल १ लाख ३४ हजार ६७५ विद्यार्थ्यांना प्रावीण्यासह प्रथम श्रेणी म्हणजेच ७५ % हून अधिक गुण मिळाले आहेत. यामुळे पदवी प्रवेशासाठीची स्पर्धा किती तीव्र असणार आहे याची कल्पना सहज येऊ शकते. १ लाख २७ हजार २५६ विद्यार्थ्यांना ६० टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळाले आहेत तर ४५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३० हजार ५७४ आहे. ९७१ विद्यार्थ्यांना ३५ टक्क्यांहून अधिक गुण आहेत.
मुले मुली उत्तीर्णतेचे प्रमाण
विद्यार्थी - परीक्षेस बसलेले - उत्तीर्ण - टक्केवारी
मुले - १५२६११- १५२२२३- ९९.७४%
मुली - १४१४७९- १४१२५६- ९९. ८४%
जिल्हा निहाय निकाल
जिल्हा - एकूण विद्यार्थी - उत्तीर्ण विद्यार्थी - टक्केवारी
ठाणे - ८६५३७- ८६४३३- ९९. ८७%
पालघर - ४२४८४- ४२२८४- ९९. ५२ %
रायगड - २८७६०- २८७०६- ९९. ८१%
बृहन्मुंबई - ३६४१३- ३६३५६- ९९. ८४ %
मुंबई उपनगर १- ६३०७७- ६२९४८- ९९. ७९%
मुंबई उपनगर २ - ३६८१९- ३६७५२- ९९. ८१%
एकूण - २९४०९०- २९३४७९- ९९. ७९ %
शाखानिहाय निकाल
शाखा - परीक्षेस बसलेले विद्यार्थी - उत्तीर्ण - टक्केवारी
विज्ञान - ८०५४० - ८०२०३- ९९. ५८ %
कला - ४४००५- ४३९१२- ९९. ७८ %
वाणिज्य - १६५१८८- १६५०३२- ९९. ९० %
किमान कौशल्य - ४३५७- ४३३२- ९९. ४२ %
एकूण - २९४०९०- २९३४७९- ९९. ७९ %
श्रेणीनिहाय निकाल
विद्यार्थी संख्या - प्राविण्यासह प्रथम श्रेणी - प्रथम श्रेणी - द्वितीय श्रेणी - उत्तरीनं श्रेणी - एकूण
२९४०९०- १३४६५७- १२७२५६- ३०५७४- ९७१- २९३४७९
मुंबईकर विद्यार्थ्यांचे इंग्रजीसाठी येस, इंग्रजीच्या निकालात ९ टक्क्यांची वाढ
मुंबई : यंदाचा बारावीचा निकाल हा विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनावरचा आहे. त्यामुळे मराठी, हिंदी, इंग्रजी या विषयांमध्ये विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले असून, या विषयांचा निकाल ९९. ९६ टक्के लागला आहे. त्यातही अनेक विद्यार्थ्यांच्या इंग्रजीच्या निकालात सुधारणा झाली असून, मागील वर्षीपेक्षा इंग्रजीच्या निकालात ९ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मागील वर्षीचा इंग्रजी विषयाचा निकाल हा ९०. ७५ टक्के इतका होता. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या गुणवाढीसाठी यंदा इंग्रजी विषय आधारच ठरल्याचे म्हटले जात आहे. मराठी विषयात २ टक्क्यांची वाढ दिसून आली . मागील वर्षी मराठी विषयात उत्तीर्ण होणाऱ्यांची टक्केवारी ९७. १२% होती. संस्कृत, हिंदी या विषयामध्येही मुंबईकर विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढलेली दिसून आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतलेल्या परीक्षेमध्ये १६० विषयांपैकी तब्बल ७० विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
मुलींचा टक्का जास्त
यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली असून मुलींचा बारावीचा निकाल ९९. ८४ % आहे तर मुलांचा ९९. ७४ % आहे. यंदा बारावीसाठी मुंबई विभागातून १ लाख ४१ हजार ४७९ मुली बसल्या होत्या, त्यातील १ लाख ४१ हजार २५६ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तसेच बारावीला मुंबई विभागातून बसलेल्या मुलांची संख्या १ लक्ष ५२ हजार ६११ होती त्यातील १ लक्ष ५२ हजार २२३ मुले उत्तीर्ण झाली आहेत.