Join us  

त्या एका गाण्याने सिनेमाची वाट लावली..; १२ वर्षांनंतर ऐश्वर्या रजनीकांतने सांगितली मनातली खदखद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 4:58 PM

१२ वर्षांनी ऐश्वर्या रजनीकांतने 'व्हाय दिस कोलावरी डी' गाण्याबद्दल तिच्या मनातली खंत व्यक्त केलीय (Why This Kolaveri Kolaveri Di)

ऐश्वर्या रजनीकांत दिग्दर्शित 'लाल सलाम' (Lal Salaam) सिनेमा काहीच दिवसांपुर्वी रिलीज झाला. 'लाल सलाम' बॉक्स ऑफीसवर फार काही चमक दाखवू शकला नाही. या सिनेमात रजनीकांत (Rajinikanth) आणि क्रिकेटपटू कपिल देव (Kapil Dev) विशेष भूमिकेत झळकले. या सिनेमानिमित्ताने ऐश्वर्या रजनीकांत विविध मुलाखतीमधून अनेक किस्से उलगडताना दिसत आहे. अशातच ऐश्वर्याने १२ वर्षानंतर 'व्हाय दिस कोलावरी डी' (Why This Kolaveri Kolaveri Di) गाण्याबद्दल तिचं स्पष्ट मत सांगून शॉकिंग खुलासा केलाय. 

'व्हाय दिस कोलावरी डी' हे ऐश्वर्या रजनीकांत दिग्दर्शित '3' सिनेमातील गाणं. हे गाणं भारतात नव्हे तर जगभरात लोकप्रिय झालं. हे गाणंच नव्हे तर गाण्याचा व्हिडीओही चांगलाच गाजला. १२ वर्षांनंतर ऐश्वर्याने या गाण्याविषयी धक्कादायक खुलासा केला. ती म्हणाली, "सिनेमातलं गाणंच इतकं लोकप्रिय झालं की लोकांनी सिनेमाबद्दल एक चकार शब्द काढला नाही. या गाण्याने चित्रपटाच्या यशावर भयंकर परिणाम झाला."

ऐश्वर्या पुढे म्हणाली, "मी चित्रपटाच्या माध्यमातून वेगळी कथा सांगण्याचा प्रयत्न करत होतो. पण त्या गाण्याने चित्रपटाचा ताबा घेतला. माझ्यासाठी हे पचवणं खूप अवघड होते. हा एक गंभीर चित्रपट होता. पण गाणं इतकं सुपरहिट झालं की चित्रपटाच्या कथेकडे लोकांनी दुर्लक्ष केलं." 'व्हाय दिस कोलावरी डी' हे गाणे तामिळ आणि इंग्रजीचे मिश्रण होते. धनुषची पूर्वपत्नी आणि रजनीकांत यांची लेक ऐश्वर्याने सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. सिनेमात धनुष आणि श्रृती हासन प्रमुख भूमिकेत होते.

टॅग्स :धनुषरजनीकांतश्रुती हसनकपिल देव