टीव्ही मालिका टीआरपी मिळवण्यासाठी तसेच सुरु होताच कमी वेळेत रसिकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी अनेक रंजक वाटाव्या अशा गोष्टी करताना दिसतात. मात्र कधी कधी अतिरंजक दाखवण्याच्या नादात रसिकांच्या भावना दुखावल्या जाणार नाही याचे भान विसरल्याचे पाहायला मिळत आहे. 'येऊ कशी तशी मी नांदायला' ही मालिका नवीन नवीन ट्विस्ट आणि टर्नमुळे रसिकांची पसंती मिळवण्यात कुठेतरी यशस्वी ठरत होती.मात्र तितक्यात अशा काही वळणावर मालिका पोहचली की रसिकांनी मालिकेकडे पाठ फिरवणेच पसंत केले आहे.
मालिकेतील एका दृश्यावर प्रेक्षकांना नाराजी व्यक्त केली आहे. मालिेकेतील सगळीच पात्र रसिकांची पसंती मिळवत असली तरी मालविकाचं पात्र काही रसिकांच्या पचनी पडलेले दिसत नाही. तिचं वागणं हे अत्यंत खालच्या दर्जाचे असल्याचे प्रतिक्रीया उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे.
मालविका अत्यंत श्रीमंत असल्यामुळे तिच्यासमोर सगळेच दुय्यम असल्याचे दाखवण्यात आले आहे. इतकेच काय तर राग दाखवण्यासाठी ती रॉकीच्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा घालून त्याला शिक्षा देते. असं दृश्य दाखवण्यात आलं आहे. हेच दृष्य पाहून चाहत्यांचा मात्र संताप होत आहे. मालिका या मनोरंजनासाठी असतात हेच सध्या कुठेतरी विसरत चालल्याचे दृष्य आहे. मनोरंजनाच्या नावाखाली वाटेल ते दाखवणे चुकीचे असल्याचे रसिकांचे म्हणणे आहे.मालिका सुरु झाली तेव्हा मालिका कॉमेडी फॅमिली ड्रामाने भरलेली असून प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, असा विश्वास व्यक्त केला जात होता. मात्र मालिका कुठेतरी भरकटत असल्याचे म्हटले जात आहे.
कोरोना महामारीमुळे छोट्या पडद्यावरच्या अनेक मालिकांना ब्रेक लागला. हळूहळू गाडी रूळावर आली आणि आता नव्या मालिकांची रेलचेल दिसतेय. येत्या दिवसांत अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. आता नव्या मालिका येणार म्हटल्यावर जुन्या मालिका निरोप घेणार आहेत.