Join us  

अशी घडणार छत्रपती शिवराय आणि युवराज शंभूराजे यांची पन्हाळगडावरील ऐतिहासिक भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 1:14 PM

शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या आयुष्यातील ही शेवटची भेट असल्याने ती जेवढी राजकीयदृष्ट्या महत्त्वाची होती तेवढीच भावनिक दृष्ट्याही महत्त्वाची होती.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे वारसदार संभाजी महाराजांचा खरा इतिहास जगासमोर आणण्यासाठी आज विविध बाजूंनी प्रयत्न केले जात आहेत. 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका त्याच प्रयत्नांचा एक भाग. चित्रीकरण मालिकेला अल्पावधीतच रसिकांची भरपूर पसंती मिळाली आहे. प्रेक्षकांनी या मालिकेला खूप लोकप्रिय केलंय. ‘जगदंब क्रिएशन’ची निर्मिती असलेल्या झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेने आजवर संभाजी महाराजांच्या जीवनावरील महत्त्वाच्या घडामोडींसोबतच बारीकसारीक प्रसंगांवर प्रकाश टाकत खरा इतिहास सादर करण्याचं काम केलं आहे. यात काही नावीन्यपूर्ण वाटाव्यात अशा घटनांचा उलगडाही प्रेक्षकांना होतो आहे. यात आता संभाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाचं समजल्या जाणाऱ्या एका प्रकरणाचा उलगडा होणार आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांनी जगातील पहिल्या लोकाभिमुख स्वराज्याची स्थापना केली. शून्यातून स्वराज्य निर्माण करणं हे सहज शक्य नव्हतं, पण त्याहून कठीण होतं ते निर्माण केलेलं स्वराज्य टिकवणं, वाढवणं. छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या मर्द मावळ्यांनी हे आव्हान स्वीकारलं आणि सक्षमपणे पेललं सुद्धा. 

संभाजी महाराजांबद्दल आजवर अनेकदा इतिहासकारांकडून, बखरकारांकडून अनेक कथा रंगवल्या गेल्या आहेत. पण त्या सगळ्या गोष्टींमागचा खरा इतिहास लोकांसमोर आणण्याच काम झी मराठीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मलिका यशस्वीरीत्या करत आहे. शिवाजी महाराजांच्या भूमिकेतून शंतनू मोघे आणि संभाजी महाराजांच्या भूमिकेतून डॉ. अमोल कोल्हे यांनी या दोन्ही व्यक्तिरेखा उत्तमरित्या साकारल्या आहेत. प्रेक्षकांचा ही या मालिकेला उदंड प्रतिसाद मिळत आहे. 

संभाजी महाराजांच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण प्रसंग आता या मालिकेतून आपल्यासमोर येणार आहे. दिलेरखानाच्या छावणीतून निघाल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज शंभूराजे या पितापुत्रांची भेट पन्हाळगडावर घडली होती. त्या दोघांच्याच आयुष्यातील नव्हे तर शिवकालीन इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना म्हणून या भेटीचा उल्लेख केला जातो. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या आयुष्यातील ही शेवटची भेट असल्याने ती जेवढी राजकीयदृष्ट्या महत्त्वाची होती तेवढीच भावनिक दृष्ट्याही महत्त्वाची होती. लवकरच ही ऐतिहासिक घटना आपल्याला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतून पाहायला मिळणार आहे.  

या भेटीत शिवाजी महाराज आणि शंभूराजे यांच्यात काय चर्चा होणार? सोयराबाई संभाजी महाराजांना स्वीकारणार का? यापुढे दिल्ली आणि रायगडावरच्या राजकारणाला कोणती नवी दिशा मिळणार? आनाजी दत्तोंची या सगळ्यात काय भूमिका असेल? हे सगळं जाणून घ्यायचं असेल आणि पन्हाळगडावरील हे ऐतिहासिक भेटीचे भाग  मंगळवार २३ ऑक्टोबर ते शनिवार २७ ऑक्टोबर या दरम्यान रसिकांना अनुभवता येणार आहे. 

टॅग्स :स्वराज्य रक्षक संभाजी