Join us  

सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर कार्यक्रमामधील स्वराली जाधव ठरली राजगायिका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 7:25 PM

स्वराली जाधव हिने सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर कार्यक्रमाची राजगायिका होण्याचा मान पटकावला.

कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर या कार्यक्रमामधील छोट्या सुरविरांनी अवघ्या महाराष्ट्राला तब्बल सहा महिने त्यांच्या निखळ, निरागस स्वरांनी एकत्र बांधून ठेवले. सहा महिन्यांपूर्वी २१ छोट्या सुरवीरांसोबत सुरु झालेल्या या प्रवासामध्ये स्पर्धकांना बरेच काही शिकायला मिळाले आणि याच स्पर्धकांमधून कार्यक्रमाच्या मंचाला मिळाले अंतिम सहा शिलेदार - स्वराली जाधव, मीरा निलाखे, सई जोशी, उत्कर्ष वानखेडे, चैतन्य देवढे आणि अंशिका चोणकर. याच सहा स्पर्धकांमध्ये रंगला सुर्वण कट्यार मिळवण्यासाठी सुरांचा महासंग्राम. महाअंतिम सोहळ्यामध्ये स्पर्धकांमध्ये रंगलीगाण्यांची मैफल आणि महाराष्ट्राला मिळाला नवीन छोटे सुरवीर... गानसम्राज्ञी आशाताई भोसले यांच्या हस्ते विजेत्याला देण्यात आली सुवर्ण कट्यार. स्वराली जाधव हिने सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर कार्यक्रमाची राजगायिका होण्याचा मान पटकावला. स्वराली जाधवला कलर्स मराठीतर्फे एक लाखाचा धनादेश, मानाची सुवर्ण कट्यार आणि केसरी टूर्स तर्फे स्टुडन्ट स्पेशल नासा USA टूर ज्यामध्ये युनिवर्सल स्टुडीओज आणि डिझनीलैंड बरोबर मनोरंजन आणि ऍडव्हेंचर थीम पार्क बघण्याची सुर्वणसंधी मिळणार आहे. तर पाच छोट्या सुरवीरांसोबत मॉनिटरला देखील कलर्स मराठी तर्फे एक लाखाचा धनादेश आणि केसरी टूर्स तर्फे स्टुडंट स्पेशल हिमाचल प्रदेशचा दौरा ही विशेष भेट मिळाली.सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर या कार्यक्रमातील कुठलेही गाणे सहज गाण्याची सईची कला, चैतन्याचा खडा आवाज, उत्कर्षाच्या गाण्यातील ठेहेराव, मीराचा गोड आवाज, अंशिकाच्या गायिकीचे वैविध्य या त्यांच्यातील वैशिष्ट्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकले. कार्यक्रमामधील एका पेक्षा एक सुरेल स्पर्धकांना मागे टाकत या सहा स्पर्धकांनी अंतिम फेरीमध्ये जाण्याचा मान मिळवला. महा अंतिम सोहळ्यामध्ये शाल्मली, अवधूत गुप्ते आणि विशेषतः महेश काळे यांनी सहा छोट्या सुरवीरांसोबत सादर केलेल्या गाण्यांनी उपस्थितांना पुन्हाएकदा भारावून टाकले. मॉनिटर आणि प्रेसेनजीत कोसंबी यांनी सादर केलेल्या पोवाड्याने कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढवली. इतकेच नव्हे, कार्यक्रमाची रंगत वाढविण्यासाठी आणि स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी कलर्स मराठीच्या परिवारातील प्रेक्षकांचे लाडके कलाकार उपस्थित होते. सूर नवाच्या मंचावर सहा सुरवीरांनी त्यांचे शेवटचे गाणे सादर केले... उत्कर्षने हे सुरांनो, सईने दिलबर दिलसे प्यारे, मीराने मेरा कूछ सामान, चैतन्य याने मल्हारी तर अंशिका आणि स्वरालीने अनुक्रमे इंतहा हो गई, दमा दम ही गाणी सादर केली. सूर नवाच्या स्पर्धकांनी तसेच कॅप्टन्सनी आशाताईना त्यांचीच गाणी म्हणून सुंदर सरप्राईझ दिले. 

टॅग्स :सूर नवा ध्यास नवा