Join us  

‘सावधान इंडिया’चा सूत्रधार म्हणून सुशांत सिंह परतला!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2019 2:53 PM

प्रेक्षकांना त्यांचा आवडता आणि जुना सूत्रधार सुशांत सिंह याला पुन्हा एकदा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना पाहायला मिळणार आहे.

समाजात घडणार्‍्या अनेक गंभीर आणि क्रूर गुन्ह्यांबाबत सामान्य माणसाला जागृत आणि सावध करण्याचे काम ‘सावधान इंडिया’ ही मालिका गेली सात वर्षे करीत आहे. आता या मालिकेच्या आगामी भागांत प्रेक्षकांना सुशांत सिंहला पुन्हा एकदा सूत्रधाराच्या भूमिकेत पाहता येईल. यंदा जानेवारीत अभिनेते आशुतोष राणा आणि तिस्का चोप्रा यांनी या मालिकेचे सूत्रसंचालन केले होते, याची आम्ही वाचकांना आठवण करू देऊ इच्छितो. या काळात कार्यक्रमाच्या बदलत्या स्वरूपानुसार विविध कलाकारांना मालिकेचे सूत्रधार म्हणून सादर करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला होता. पण आता प्रेक्षकांना त्यांचा आवडता आणि जुना सूत्रधार सुशांत सिंह याला पुन्हा एकदा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना पाहायला मिळणार आहे.

आपल्या या नव्या नियुक्तीवर सुशांतसिंह म्हणाला, “मला जेव्हा सांगण्यात आलं की या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विविध कलाकार करतील, तेव्हा मला वाटलं की या कार्यक्रमाशी माझं असलेलं नातं संपुष्टात आलं. ती गोष्ट स्वीकारायला मला खूप जड गेली. पण आता मी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्यास परतलो असून मी चित्रीकरणासही प्रारंभ केला आहे, तेव्हा मला आता मी माझ्या घरी परतलो आहे, असं वाटतं.”

तो म्हणाला, “या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मी गेली सात वर्षं करीत होतो, त्यामुळे मी या कार्यक्रमाचा चेहरा बनलो आहे, असं मला वाटत होतं. देशभरातील प्रेक्षकांशी माझं छान नातंही जमलं होतं. आता मी या कार्यक्रमात पुन्हा परतलो असून त्यात मी माझं सर्वस्व देईन.” चित्रपटांमध्ये भूमिका साकारण्याच्या आपल्या अनुभवावर सुशांतसिंह म्हणाला, “मी जेव्हा सावधान इंडियासाठी काम करत होतो, तेव्हा अनेक निर्मात्यांना वाटत असे की मी फार बिझी असून माझ्याकडे चित्रपटासाठी वेळ नसेल. पण ते खरं नव्हतं. अर्थात सूत्रसंचालना व्यतिरिक्तही मला इतर कामं करायला आवडतील.” 

टॅग्स :सुशांत सिंगसावधान इंडिया