रवी जाधव आणि बेला शेंडे सारेगमपमध्ये झळकणार परीक्षकाच्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2017 11:47 IST
संगीत म्हणजे मराठमोळ्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. झी मराठीने सुरुवातीपासून मराठी माणसाची ही संगीताची आवड आपल्या दर्जेदार कार्यक्रमांमधून जोपासली ...
रवी जाधव आणि बेला शेंडे सारेगमपमध्ये झळकणार परीक्षकाच्या भूमिकेत
संगीत म्हणजे मराठमोळ्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. झी मराठीने सुरुवातीपासून मराठी माणसाची ही संगीताची आवड आपल्या दर्जेदार कार्यक्रमांमधून जोपासली आहे. मराठी संगीत क्षेत्रातील लोकप्रिय कार्यक्रम 'सारेगमप' हे त्याचे उत्तम उदाहरण! 'घे पंगा, कर दंगा' असे म्हणत १३ नोव्हेंबरपासून हा कार्यक्रम पुन्हा आपल्या भेटीस येत आहे. मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक आणि निर्माते रवी जाधव या पर्वात परीक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्यासोबत स्पर्धकांना मार्गदर्शन मिळेल, सुप्रसिद्ध पार्श्वगायिका बेला शेंडेचे आणि महाराष्ट्राचा लाडका लिटिल चॅम्प रोहित राऊत या पर्वात सूत्रसंचालकाच्या वेगळ्या भूमिकेत आपणास पाहायला मिळणार आहे. संगीत क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या अनेकांसाठी 'सारेगमप'चा मंच नेहमीच जिव्हाळ्याचा विषय ठरला आहे. आपली कला जगासमोर सादर करण्यासाठी धडपडणाऱ्या टँलेन्टेड तरुणाईसाठी 'सारेगमप'चे नवे पर्व सुवर्णसंधी ठरणार आहे. सारेगमपच्या या पर्वात प्राथमिक निवड चाचणीपासून ते अंतिम फेरीपर्यंत नेहमीपेक्षा थोडी हटके आणि कल्पक अशी कार्यक्रमाची रूपरेषा पाहायला मिळणार आहे. तरुणाईच्या सळसळत्या उत्साहाला वाव देण्यासाठी 'घे पंगा, कर दंगा' असे आवाहन करत महाराष्ट्र आणि गोव्यातील एकूण सहा शहरांमध्ये ऑडिशन्स घेतली जाणार आहेत. १६ ते ३० वयोगटातील तरुण गायक-गायिकांनाच आपली कला जगासमोर सादर करण्याची संधी मिळणार आहे. प्रत्येक शहरांतून साधारण १० स्पर्धक मुंबईला होणाऱ्या पुढील फेरीसाठी निवडण्यात येतील. पुढे त्यातील २४ उत्तम गायक स्पर्धकांची गाला राउंडसाठी निवड होईल, या फेरीत ज्या स्पर्धकाच्या सुरांचा दंगा अधिक श्रवणीय ठरेल तो किंवा तीच ठरेल 'सारेगमप'च्या या पर्वाचा महाविजेता!रवी जाधव यांची कोणत्याही कार्यक्रमाचे परीक्षण करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याविषयी ते सांगतात, "सर्वप्रथम 'सारेगमप'चा परीक्षक ही भूमिका पार पाडण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दडलेलं टॅलेंट शोधून काढणं खरंच आव्हानात्मक आहे, याचं कारण म्हणजे आजकालची तरुणपिढी संगीताबाबत इतकी जागरूक आहे आणि त्यांचे झपाटून टाकणारे सादरीकरण ऐकून त्यांच्यात डावं उजवं करणे खूप अवघड ठरणार आहे. तरीही, जगभरातील संगीतप्रेमींना आपलासा वाटेल असा आवाज या स्पर्धेतून शोधून काढणे आणि मराठी संगीत क्षेत्राला नवं गानरत्न मिळवून देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. Also Read : रवी जाधव यांचा नवा चित्रपट रंपाट