भावाबहिणीच्या नात्यातील प्रेमाचं प्रतीक म्हणजे रक्षाबंधन हा सण. प्रत्येकासाठी हा सण खास असतो...जाणून घेवूया टीव्ही कलाकारांच्या वेड्या बहिणीची वेडी माया. कारण रक्षाबंधन असल्याने सगळ्याच बहिणी खूप आनंदी आहेत. प्रत्येक बहिणीसाठी हा खूप महत्वाचा दिवस असं म्हणायला हरकत नाही. या दिवसानिमित्त छोट्या पडद्यावरील 'लक्ष्मी सदैव मंगलम्' मालिकेमधील लक्ष्मी म्हणजेच समृद्धी केळकर आणि मल्हार म्हणजेच ओमप्रकाश शिंदे तसेच 'घाडगे & सून' मालिकेतील अमृता म्हणजेच भाग्यश्री लिमये, 'राधा प्रेम रंगी रंगली' मालिकेतील राधा देशमुख - वीणा जगताप, प्रेम देशमुख – सचित पाटील यांनी त्यांचे काही अनुभव सांगितले आहेत.
अमृता (भाग्यश्री लिमये) : रिमांड होममधील रक्षाबंधन अजूनही आठवते !
'घाडगे & सून' मालिकेतील अमृता म्हणजेच भाग्यश्रीने सांगितले... रक्षाबंधन म्हणजे भाऊबहिणीच्या नात्याचं अतूट बंधन. दरवर्षी मी माझ्या भावाला राखी बांधतेच आणि मी त्याची एकुलती एक लाडकी बहीण असल्यामुळे त्याच्याकडून मला सरप्राईझ गिफ्ट मिळते. कधी कॅडबरी, कधी रिस्टवॉच तर कधी मोबाईल. लहानपणी कॉलनीतल्या सर्व मुली आपापल्या भावांना तर राखी बांधायचोच पण कॉलनीतल्याही सर्व मुलांना राखी बांधण्यासाठी त्यांच्या घरी जायचो. तेंव्हा आम्हाला टिकल्या, बांगड्या, खडूपेटी, पेन्सिल असे गिफ्ट मिळत असे. अजून एक महत्वाची गोष्ट मी माझ्या आईबरोबर एकदा रिमांडहोम मधील मुलांना राखी बांधण्यासाठी गेले होते. त्या मुलांना आम्ही राखी बांधली, खाऊ दिला आणि सोबत गिफ्टही दिले. त्यावेळेचा त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद मी कधीच विसरू शकत नाही. आता वेळेच्या अभावी राखी ऑनलाईन पाठवावी लागते पण फोनवर बरचं बोलण होतं.
प्रेम देशमुख म्हणजेच सचित पाटील : यंदा रक्षाबंधन माझ्या घरी !
'राधा प्रेम रंगी रंगली' मालिकेतील प्रेम देशमुख म्हणजेच सचित पाटील म्हणाला, यावर्षीच रक्षाबंधन माझ्या घरी होणार आहे. छान जेवणाचा आणि गप्पांचा बेत आखला आहे. बहीण – भाऊ हे नातं खूप खास आणि जवळच असतं. त्यामुळेच दरवर्षी मी आणि माझी बहीण सोनल नित्यनेमाने रक्षाबंधन आणि भाऊबीज साजरी करतो. सणांच्या निमित्ताने कुटुंबाला एकत्र भेटण्याची संधी मिळते. माझ्या आयुष्यातील प्रत्येक रक्षाबंधन हे खास आहे.
मल्हार म्हणजेच ओमप्रकाश शिंदे : बहिणीला दिलेलं सरप्राईझ !
'लक्ष्मी सदैव मंगलम्' मालिकेमधील मल्हार म्हणजेच ओमप्रकाश शिंदे म्हणाला... बऱ्याचदा मला रक्षाबंधनला सुट्टी मिळायची नाही. ४ वर्षांपूर्वी असंच रक्षाबंधनला मला सुट्टी मिळत नव्हती. बहिणीला सांगितलं की यावर्षी नेहमीसारखं राखी पार्सल करावी लागणार. पण अनपेक्षितपणे मला सुट्टी मिळाली आणि मी बहिणीला सरप्राईज दिलं. तेव्हा साजरा केलेलं रक्षाबंधन हे आम्हा दोघांसाठी विशेष होतं. यावर्षी मात्र शूटिंगच्या गडबडीमुळे मी गावी जाऊ शकणार नाही. त्यामुळे विडिओ कॉल वर रक्षाबंधन साजरा करावं लागणार.
लक्ष्मी म्हणजेच समृद्धी केळकर : वेळ काढून आपले सण साजरे करून ते जतन करूया !
'लक्ष्मी सदैव मंगलम्' मालिकेमधील लक्ष्मी म्हणजेच समृद्धी केळकर म्हणाली...हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. रक्षाबंधन हे आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये पवित्रता व मांगल्य निर्माण करण्याचे बंधन आहे...पूर्वापार चालत आलेली ही परंपरा आजही काही प्रमाणात जोपासली जाते...तरीही आजच्या या धकाधकीच्या जीवनात वेळेला खूप महत्त्व आहे..प्रत्येक जण स्वतःच्या कामात व्यस्त आहे त्यामुळे सगळ्यांनाच हा दिवस साजरा करायला मिळतोच असं नाही.... काळा नुसार गोष्टी बदलतात हे खरंय...पूर्वी भाऊ बहीण भेटून हा दिवस साजरा केला जायचा...पण आता या टेक्नॉसॅव्ही जगात मेल, कुरीयरने राख्या पाठवून शुभेच्छा दिल्या जातात...आता कामाच्या व्यापातून आपण प्रत्येकाने स्वतःच्या माणसांसाठी थोडासा वेळ काढून आपले सण साजरे करून त्यांचं जतन करूयात....
माझ्या आठवणीत राहिलेलं रक्षाबंधनच वर्ष म्हणजे मी लहानपणी भावाला राखी बांधायच्या आधीच गिफ्ट मागितले होते ...की ते गिफ्ट दे मग राखी बांधेन...त्यावर सगळे हसले होते आणि आधी गिफ्ट घेऊन मग मी राखी बांधली....अजूनही मी आणि माझे भाऊ हा सण साजरा करतो....शूट असल्यामुळे मला या वर्षी वेळ देता येईल कि नाही माहिती नाही पण वेळ मिळाला तर नक्की आम्ही नेहेमीसारखा मजा मस्ती करणार एवढं नक्की.....