राजीव निगम म्हणतोय, हर शाख पे उल्लू बैठा है
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 12:08 IST
स्टार प्लसवर लवकरच आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा रिअॅलिटी शो पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाचे नाव हर शाख पे उल्लू ...
राजीव निगम म्हणतोय, हर शाख पे उल्लू बैठा है
स्टार प्लसवर लवकरच आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा रिअॅलिटी शो पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाचे नाव हर शाख पे उल्लू बैठा है असून हा शो आपल्याच मॅडकॅप जगातील एका भ्रष्ट आणि विनोदी राजकारण्याबद्दल आहे. विनोदी प्रकारातील दिग्गज अश्विनी धीर हे प्रेक्षकांसमोर या शो च्या माध्यमातून राजकीय विडंबन सादर करणार आहेत. सामान्य माणसांच्या समस्यांकडे साधारणपणे कोणाचे लक्ष जात नाही. पण या शोमधून त्यांना विनोदी पद्धतीने मांडण्यात येणार आहे.कॉमेडियन राजीव निगम या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहे. राजीव सामान्य लोकांच्या दैनंदिन आयुष्यात निर्माण होणारे विनोद सादर करणार आहे. तसेच सामान्य माणसाच्या वाट्याला येणाऱ्या समस्यांना विनोदी पद्धतीने मांडणार आहे. या आगळ्या वेगळ्या शोमध्ये प्रमुख भूमिका साकारण्यासाठी राजीव खूप खूश आहे. या कार्यक्रमाविषयी राजीव अतिशय उत्साहाने सांगतो, “होय, मी या शो चा हिस्सा आहे आणि यात प्रमुख भूमिका साकारत आहे. मी अश्विनी धीर यांचा आभारी आहे की, त्यांनी मला ही संधी दिली आणि त्यांच्यासोबत काम करताना मी स्वतःला भाग्यवान समजतो.”आजवर टीव्हीवरील अनेक कॉमेडी शोजमध्ये राजीवने काम केले असून तो हर शाख पे उल्लू बैठा है मध्ये भ्रष्ट राजकारणी नेत्याची भूमिका साकारणार आहे. या शो ची कथा तो आणि त्याच्या परिवाराभोवती फिरणार आहे. टीव्ही आणि चित्रपट उद्योगात विनोदी प्रकारात भरपूर काम केलेले दिग्दर्शक अश्विनी धीर यांचा हा शो प्रेक्षकांना आवडेल अशी त्यांना खात्री आहे. हा कार्यक्रम हा आजकालच्या सगळ्या कार्यक्रमांपेक्षा वेगळा असल्याने हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या मनात घर करेल असा या मालिकेच्या टीमला विश्वास आहे. राजीव निगमने आजवर कॉमेडी सर्कस के अजूबे, कॉमेडी नाइट्स विथ कपिल यांसारख्या कार्यक्रमांद्वारे प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. आता या कार्यक्रमात तो एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा कार्यक्रम लवकरच सुरू होणार आहे.