Join us  

सोनाक्षी सिन्हानंतर एकता कपूरवर बरसले मुकेश खन्ना; म्हणे, एकताने महाभारताचा ‘मर्डर’ केला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2020 12:49 PM

काय म्हणाले मुकेश खन्ना

ठळक मुद्देयाआधी मुकेश खन्ना यांनी सोनाक्षी सिन्हाला टोला लगावला होता. 

अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा रामायणाशी संबंधित एका प्रश्नाचे उत्तर देऊ शकली नव्हती. इतक्या सोप्या प्रश्नाचे उत्तर न आल्याने त्यावेळी सोनाक्षी प्रचंड ट्रोल झाली होती. लॉकडाऊनच्या काळात ‘रामायण’ पुन्हा सुरु झाल्यानंतर सोनाक्षी पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली. इतकेच नाही अभिनेते मुकेश खन्ना यांनीही सोनाक्षीला टोला लगावला. सोनाक्षीनंतर आता मुकेश खन्ना यांनी एकता कपूर हिला लक्ष्य केले आहे. पण यावेळी प्रकरण रामायणाशी नाही तर महाभारताशी संबंधित आहे.

होय, लॉकडाऊनच्या काळात रामायण, महाभारत, शक्तिमान अशा मालिका पुन्हा टीव्हीवर परतल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुकेश खन्ना ‘शक्तिमान’बद्दल बोलले आणि बोलता बोलता त्यांनी एकता कपूरला असा काही टोला लगावला की, सगळेच अवाक् झालेत.होय, मुंबई मिररला दिलेल्या एका ताज्या मुलाखतीत मुकेश खन्ना यांना ‘शक्तिमान’च्या नव्या व्हर्जनबद्दल विचारले गेले. या प्रश्नाला उत्तर देताना मुकेश खन्ना यांनी एकताला असा काही चिमटा काढला की, सगळेच चकीत झालेत. ‘शक्तिमान’चे नवे व्हर्जन आलेच तर ते एकता कपूरच्या महाभारतासारखे नसेल. एकता कपूरच्या महाभारतात द्रौपदीच्या खांद्यावर टॅटू दाखवण्यात आला होता. तो टॅटू पाहून मला धक्का बसला होता, असे मुकेश खन्ना म्हणाले.

(2008 साली एकताने महाभारताचे ‘मॉडर्न व्हर्जन’ प्रसारित केले होते.)

ते केवळ इथेच थांबले नाहीत तर  एकता कपूरच्या ‘महाभारत’ या मालिकेवर पुढे ते चांगलेच बरसले. ‘एकता कपूरने मॉडर्न महाभारत दाखवल्याचा दावा केला होता. पण माझ्या मते, संस्कृती कधीच मॉडर्न होत नाही. ज्या दिवशी संस्कृतीला मॉडर्न कराल त्यादिवशी ती संपेल. मी कुणालाच ‘शक्तिमान’चा मर्डर करू देणार नाही. जसा एकता कपूरने ‘महाभारत’चा केला. एकता कपूरने देवव्रतच्या भीष्ण प्रतिज्ञेचा अर्थच बदलून टाकला. मला अशा टीव्ही मालिकांवर तीव्र आक्षेप आहे. रामायण महाभारत हा आपला इतिहास आहे. त्या केवळ पौराणिक कथा नाहीत.’तुम्हाला ठाऊक असेलच की, 1988 साली टीव्हीवर पहिल्यांदा महाभारत ही मालिका प्रसारित केली गेली होती. यात मुकेश खन्ना यांनी भीष्म पितामहाची भूमिका साकारली होती.  

सोनाक्षी सिन्हाला लगावला टोला

याआधी मुकेश खन्ना यांनी सोनाक्षी सिन्हाला टोला लगावला होता. रामायण पुन्हा एकदा प्रसारित होतेय, याचा मला आनंद आहे. सोनाक्षी सिन्हासारख्या अनेकांसाठी हे चांगले आहे. ते पाहिल्यानंतर तरी त्यांना आपल्या पौराणिक ग्रंथाबद्दल माहिती मिळेल, असे मुकेश खन्ना म्हणाले होते.

टॅग्स :मुकेश खन्नाएकता कपूर