Join us  

असा होता ‘महाभारत’च्या शूटींगचा अखेरचा दिवस, अनेक वर्षे जुना व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 11:05 AM

दूरदर्शनवरच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी मालिका म्हणजे, ‘महाभारत’. ही मालिका आठवण्याचे कारण म्हणजे, या मालिकेचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आहे, शेवटच्या दिवसाच्या शूटींगचा.

ठळक मुद्दे 24 जून 1990 रोजी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता.

दूरदर्शनवरच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी मालिका म्हणजे, ‘महाभारत’. 1988 मध्ये सुरु झालेली आणि दर रविवारी प्रसारित होणारी ही मालिका पाहण्यासाठी लोक सकाळी 9 वाजता टीव्हीसमोर बसायचे. अनेकांच्या घरी त्याकाळी टीव्ही नसायचे. अशावेळी शेजा-यांकडे जाऊन ही मालिका बघितली जाई. गावागावात अगदी टॅक्टरच्या बॅटरीला टीव्ही कनेक्ट करून ‘महाभारत’ बघितले जाईल. ही मालिका आठवण्याचे कारण म्हणजे, या मालिकेचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आहे, शेवटच्या दिवसाच्या शूटींगचा.

‘महाभारत’चे 94 एपिसोड शूट केले गेलेत. अखेरच्या दिवसाच्या शूटींगवेळी सगळेच कलाकार भावूक झालेले व्हिडीओत दिसत आहेत. एकमेकांच्या गळ्यात पडून सगळे रडत आहेत. व्हिडीओच्या बॅकग्राऊंडमध्ये ‘कर्म है गीता उपदेश, महाभारत है शांती संदेश’ हे गाणे सुरु आहे. भीष्म पितामहची भूमिका साकारणारे मुकेश खन्ना, कृष्णाची भूमिका साकारणारे नितीश भारद्वाज, कर्ण साकारणारे पंकज धीर, युधिष्ठिराची भूमिका साकारणारे गजेंद्र चौहान सगळेच भावूक झालेले दिसत आहेत. सेटवरची गर्दी, कलाकारांचे पोशाख, त्यांचे मेकअपचे साहित्य व्हिडीओत दिसत आहे.बी. आर. चोप्रा यांचे पुत्र रवी चोप्रा यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले होते. 24 जून 1990 रोजी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. आज ही मालिका ऑफ एअर होऊन 29 वर्षांचा काळ लोटला. मात्र या मालिकेतील सर्व पात्र आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर या मालिकेच्या आठवणी आणखी ताज्या होतील, यात शंकाच नाही.

टॅग्स :सोशल व्हायरल