Join us  

मला पैशांची गरज आहे, मी एकटा पडलोय, महाभारतातील इंद्राची चित्रपटसृष्टीकडे मदतीची याचना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 11:49 AM

सतीश यांनी देव आनंद, दिलीप कुमार, शाहरूख खान अशा दिग्गजांसोबत काम केले. एकेकाळी पंजाबी सिनेमाचे ‘अमिताभ बच्चन’ म्हणून ते ओळखले जायचे.

ठळक मुद्देसतीश सध्या भाड्याच्या घरात राहात आहेत. पण देशात लॉकडाऊन असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्याकडे जेवणासाठी अथवा औषधासाठी देखील पैसा नाहीये.

बॉलिवूडच्या ग्लॅमरस जगात कोण कधी यशोशिखरावर जाईल आणि कधी कुणाला अपयशाला सामोरे जावे लागेल, याचा नेम नाही. बॉलिवूड, टीव्ही आणि पंजाबी सिने अभिनेते सतीश कौल यांची कथाही अशीच. सतीश कधी काळी हिंदी आणि पंजाबी सिनेमातील एक मोठे नाव होतं. सतीश यांनी देव आनंद, दिलीप कुमार, शाहरूख खान अशा दिग्गजांसोबत काम केले. एकेकाळी पंजाबी सिनेमाचे ‘अमिताभ बच्चन’ म्हणून ते ओळखले जायचे. 1974 ते 1998 याकाळात त्यांनी 300 हून अधिक चित्रपटांत काम केले. बी.आर.चोप्रा यांच्या महाभारत या मालिकेत देखील आपल्याला त्यांना पाहायला मिळाले होते. त्यांनी या मालिकेत इंद्राची भूमिका साकारली होती. पण आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

सतीश सध्या भाड्याच्या घरात राहात आहेत. पण देशात लॉकडाऊन असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्याकडे जेवणासाठी अथवा औषधासाठी देखील पैसा नाहीये. अनेक वर्षं सतिश चित्रपटसृष्टीचा भाग होते. आज त्यांच्या या वाईट काळात चित्रपटसृष्टीतील लोकांनी पुढे येऊन त्यांना मदत करावी अशी याचना ते करत आहेत. एवढेच नव्हे तर त्यांना काम मिळाले तर त्यांना पुन्हा चित्रपटसृष्टीचा भाग व्हायचे आहे. 

सतीश यांचे वडील हे प्रसिद्ध शायर होते. त्यांच्या वडिलांनी त्यांना शिक्षणासाठी पुण्यात पाठवले. तिथे त्यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये अभिनयाचे धडे गिरवले. जया बच्च, शत्रुघ्न सिन्हा, डॅनी डेंझोम्पा यांसारखे दिग्गज कलाकार त्यांच्या वर्गात होते. त्यांनी इथूनच त्यांच्या बॉलिवूड प्रवासाला सुरुवात केली. त्यांनी जवळजवळ ३० वर्षं चित्रपटांमध्ये काम केले. 1973 ला सतिश कौल यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर काहीच वर्षांत त्यांचे लग्न झाले. त्यांच्या पत्नीच्या कुटुंबातील सगळे अमेरिकेत राहात होते. त्यामुळे आपण देखील अमेरिकेला कायमचे जावे असे त्यांच्या पत्नीचे म्हणणे होते. पण काही केल्या सतीश आपले अभिनय करियर सोडायला तयार नव्हते आणि त्याचमुळे त्यांच्या पत्नीत आणि त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि ते एकटे राहायला लागले.

अनेक वर्षं चित्रपटसृष्टीत काम केल्यानंतर सतीश यांनी एका वाहिनीद्वारे लोकांना अभिनयाचे धडे द्यायला सुरुवात केली. सगळे काही सुरळीत सुरू असताना २०१४ मध्ये ते बाथरूममध्ये पडले आणि त्यांना दुखापत झाली. त्यांनी यावर मुंबईत उपचार घेतले. ते जवळजवळ दोन वर्षं अंथरुणाला खिळून होते. त्यानंतर काही महिने पटियाला येथील रुग्णायलात त्यांना दाखल करण्यात आले होते. या सगळ्यात त्यांनी कमावलेले सगळे पैसे संपले. त्यांच्या या वाईट काळात त्यांना ११ हजार रुपये पेशन्स देण्याचा निर्णय पंजाब सरकारने घेतला. त्यांनी या मिळणाऱ्या पैशांतून अ‍ॅक्टिंग स्कूल सुरू केले. पण त्याला लोकांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ते वृद्धाश्रमात राहायला लागले. त्यांची परिस्थिती कळल्यानंतर त्यांच्या एका फॅनने त्यांना घरी नेले. 

टॅग्स :महाभारत