Join us  

'मन झालं बाजींद' मालिकेत अशा प्रकारे पार पडलं कृष्णाचं पहिलं हळदीकुंकू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 1:13 PM

'मन झालं बाजींद' (Man Jhala Bajind)ने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. मालिकेत मकर संक्रांती निमित्त कृष्णाचं पहिलंच हळदीकुंकू आयोजित केलं आहे.

मन झालं बाजींद या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. या मालिकेतील व्यक्तिरेखा आणि त्यांचा उत्तम अभिनय प्रेक्षकांचा पसंतीस पडला आहे. मालिकेत प्रेक्षकांनी नुकतंच पाहिले की कृष्णाला जबरदस्त शॉक लागल्यामुळे तिचा उजवा हात निकामी झाला आहे, त्या हाताच्या संवेदना निघून गेल्या आहेत.

मकरसंक्रांती निमित्त कृष्णाचं पहिलंच हळदीकुंकू आयोजित केलं आहे. हळदी कुंकू हे उजव्या हाताने लावायचं अशी मान्यता आहे. पण कृष्णाचा उजवा हात निकामी झाला असल्यामुळे ती डाव्या हाताने हळदी कुंकू लावते. त्यामुळे सगळ्या बायका कुजबुज करायला लागतात, पहिलंच हळदीकुंकू आणि कृष्णाला उजव्या हाताने हळदीकुंकू पण लावता येत नाही आहे. यावरून सगळ्या बायका तिला टोमणे मारायला लागतात. त्यावेळी राया कृष्णाच्या मदतीला धावून येतो आणि सगळ्यांना समजवतो की आपण डावा-उजवा यामध्ये भेदभाव करण्यापेक्षा परंपरेला महत्व दिले पाहिजे.

मालिकेतून दिला महत्त्वाचा संदेश

एखाद्याच्या व्यंगांची मस्करी करण्यापेक्षा त्याने मनापासून जपलेल्या परंपरेला महत्व द्या. असा मूल्यवान संदेश या मालिकेतून प्रेक्षकांना मिळणार आहे. त्यामुळे लोकांच्या विचारसरणीत चांगला फरक पडेल. मालिकेतून असा महत्वाचा संदेश देणं हे खरंच उल्लेखनीय आहे. त्यामुळे मन झालं बाजींदचा हा आगामी भाग पाहायला विसरू नका.

टॅग्स :मकर संक्रांती