द कपिल शर्मा शो जाणार ब्रेकवर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 12:04 IST
द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाचा टिआरपी दिवसेंदिवस ढासळत चालला आहे. त्यामुळे आता हा कार्यक्रम काही महिन्यांच्या ब्रेकवर जाणार ...
द कपिल शर्मा शो जाणार ब्रेकवर?
द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाचा टिआरपी दिवसेंदिवस ढासळत चालला आहे. त्यामुळे आता हा कार्यक्रम काही महिन्यांच्या ब्रेकवर जाणार असल्याचे म्हटले जात आहे. काही महिन्यांच्या ब्रेकनंतर हा कार्यक्रम पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या कार्यक्रमाचा संपूर्ण फॉरमॅटच बदलला जाणार असल्याचे म्हटले जात आहे. डीएनए या वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीनुसार, हा कार्यक्रम ब्रेकनंतर एका नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सेलिब्रिटी ही संकल्पनाच या कार्यक्रमातून हद्दपार होणार असल्याचे म्हटले जात आहे.द कपिल शर्मा शो गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. सगळ्या सेलिब्रेटींचा तर हा अतिशय आवडता कार्यक्रम आहे. प्रत्येक जण आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी याच कार्यक्रमाला पहिली पसंती देतो. त्यामुळे सलमान खान, आमिर खान पासून प्रियांका चोप्रा, दिपिका पादुकोण सारख्या अनेक सेलिब्रिटींनी या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. पण गेल्या काही महिन्यांपूर्वी या कार्यक्रमाची टीम एक शो करण्यासाठी सि़डनीला गेली होती. त्यावेळी परतत असताना विमानात कपिल शर्माने दारूच्या नशेत सुनील ग्रोव्हरला शिव्या घातल्या. तसेच त्याच्यावर हातदेखील उचलला असे म्हटले जाते. त्यानंतर त्याने या कार्यक्रमाला रामराम ठोकला आणि त्याचसोबत अली असगर देखील कार्यक्रमातून बाहेर पडला. नानी या व्यक्तिरेखेत काहीही दम उरला नसल्याचे सांगत त्याने हा कार्यक्रम सोडला. अली आणि सुनीलच्या जाण्याने या कार्यक्रमाचा टिआरपी दिवसेंदिवस ढासाळायला लागला आहे आणि त्यात कपिलची तब्येत देखील काही दिवसांपासून बरी नाहीये. पण त्याही अवस्थेत कपिल चित्रीकरण करत आहे आणि फिरंगी या त्याच्या चित्रपटाचे चित्रीकरण देखील सध्या जोरात सुरू आहे. या सगळ्यामुळेच द कपिल शर्मा शो ब्रेक घेणार असल्याचे म्हटले जात आहे. Also Read : सुनील ग्रोव्हरने वाढवले त्याचे मानधन... एका एपिसोडसाठी घेतोय तब्बल इतके लाख