Join us  

Indian Idol 12 : बनावटी आहे सिंगिग रिअ‍ॅलिटी शो?, अंजली गायकवाडने केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2021 12:08 PM

इंडियन आयडॉलमधून अंजली गायकवाड बाहेर पडल्यामुळे चाहते नाराज झाले आहेत.

छोट्या पडद्यावरील रिएलिटी शो इंडियन आयडॉलला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते मात्र यंदाचा सीझन वेगवेगळ्या कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. नुकतेच या शोमधील स्पर्धक अंजली गायकवाड शोमधून बाहेर पडली. त्यानंतर प्रेक्षक खूप नाराज झाले. अंजली बाहेर पडल्यानंतर सोशल मीडियावर शोवरील नाराजी पहायला मिळाली. चाहत्यांचे म्हणणे होते की, अंजलीच्या जागी शण्मुखप्रियाला शोमधून बाहेर काढले पाहिजे होते. शो बनावटी असल्याचा आरोप होताना दिसतो आहे.

दरम्यान, आता अंजली गायकवाडने इंडियन आयडॉल शोवर केलेले आरोप आणि इतर कॉन्ट्रोव्हर्सीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. बॉलिवूड लाइफच्या रिपोर्ट्सनुसार, अंजली गायकवाड म्हणाली की, सुरूवातीच्या दोन-तीन महिन्यात आम्हाला खूप कॉम्प्लिमेंट्स मिळाले. मात्र जसजसा शो पुढे जाऊ लागला तसे शोला घेऊन निगेटिव्हिटी पसरू लागली. लोक शोला ट्रोल करू लागले आणि सोशल मीडियावर शो आणि निर्मात्यांवर निगेटिव्ह कमेंट्स करू लागले. मी नाव घेणार नाही पण काही लोकांनी म्हटले होते की, शोचे निर्माते फक्त एका व्यक्तीला हायलाइट करत आहेत आणि बाकी लोकांना नाही. मात्र आम्ही या गोष्टींकडे दुर्लक्ष केले आणि या निगेटिव्हिटीचा सामना केला. आम्ही फक्त आमच्या गायनावर लक्ष केंद्रीत केले कारण शेवटी आम्ही येथे आमचे गायन सिद्ध करायला आलो आहोत.

अंजली गायकवाड पुढे म्हणाली की, आम्ही सोशल मीडियावर लोकांना थांबवू शकत नाही. आम्ही त्या कमेंट्सकडे कानाडोळा करत फक्त आमच्या गाण्यांचा विचार करतो. मी हे सर्व केले आणि टॉप ९ पर्यंत पोहचण्यासाठी खूप मेहनत केली आणि मी खूप नशीबवान आहे.

फिनालेमधून काही दिवसांपूर्वी बाहेर पडल्यानंतर अंजली म्हणाली की, मला वाईट वाटले नाही. हा शोचा फॉरमॅट आहे आणि कोणाला ना कोणाला या शोमधून बाहेर पडायचे आहे. माझ्या वडिलांनी सांगितले की, खूप काही करायचे आहे आणि भविष्य खूप उज्वल आहे. हो थोडे वाईट वाटले पण मी पुन्हा माझा आत्मविश्वास वाढवला. मी स्वतःला सांगितले की, मला आणखी मेहनत करावी लागेल आणि जगात क्लासिकल सिंगिंगला इंट्रोड्यूस केले पाहिजे. मला संपूर्ण भारतात आणि भारताबाहेर शो करायचे आहेत.

टॅग्स :इंडियन आयडॉल