Join us  

आता असे दिसतात रामायण मालिकेतील कलाकार, अरुण गोविल यांनी सांगितल्या मालिकेच्या आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2020 6:36 PM

रामायण या मालिकेतील कलाकार द कपिल शर्मा शो मध्ये हजेरी लावणार असून या मालिकेच्या अनेक आठवणींना उजाळा देणार आहेत.

ठळक मुद्देअरुण गोविल यांनी सांगितले की, रामायण मालिकेच्या अपार लोकप्रियतेनंतर त्यांना अनेक बॉलिवूड पार्ट्यांमध्ये आमंत्रित केले जायचे. अशाच एका पार्टीत त्यांनी काही मोठमोठ्या अभिनेत्यांना त्यांच्याकडे आदराने बघत असल्याचे पाहिले.

द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा प्रचंड आवडता कार्यक्रम असून बॉलिवूडमधील मंडळी आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमाला पहिली पसंती देतात. या कार्यक्रमात आजवर बॉलिवूडमधील अनेक कलाकार, गायक, दिग्दर्शक, निर्माते तसेच खेळ जगतातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे. या आठवड्यात द कपिल शर्मा शोमध्ये आजवर सर्वाधिक नावाजलेल्या रामायण या मालिकेचे कलाकार हजेरी लावणार आहेत. भारतीय इतिहासात सर्वाधिक पाहिली गेलेली पौराणिक मालिका म्हणून रामायण या मालिकेची लिम्का बुक मध्ये नोंद झाली होती. 

आपल्या उपस्थितीने द कपिल शर्मा शोची शोभा वाढवणार्‍या रामायण मधील कलाकारांनी त्यांच्या चाहत्यांचे काही किस्से सांगितले. कपिल स्वतः देखील आपली उत्सुकता लपवू शकला नाही त्याने सांगितले, “जेव्हा ही मालिका टेलिव्हिजनवर सुरू व्हायची, तेव्हा आजूबाजूचे सगळे आमच्या घरी येऊन ही मालिका बघत असत आणि पडद्यावर देवी-देवता दिसत असल्याने सगळ्या बायका भाविकतेने डोक्यावरून ओढणी घेत असत.” 

रामायण या मालिकेमुळे इतकी लोकप्रियता मिळाल्यावर या भूमिकेपासून दूर जाणे आणि काही नवीन करणे कठीण होते का असे विचारले असता अरुण गोविल यांनी सांगितले, “रामायण केल्यानंतर मला चित्रपटात योग्य अशा भूमिका मिळत नव्हत्या. त्यासाठी मी खूप प्रयत्न करत होतो. पण काही दिवसांनी मी सुप्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांना भेटलो. ते जंजीर, लावारिस, नमक हलाल, मुकद्दर का सिकंदर यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यांनी मला एखादी मोठी भूमिका न देण्यामागील कारण सांगितले. ते म्हणाले होते की, मी तुला एखादी मोठी भूमिका देऊ शकत नाही... कारण तू अजूनही तुझ्या श्रीरामाच्या व्यक्तिरेखेसाठीच ओळखला जात आहेस आणि ती प्रतिमा अजून पुसली गेलेली नाही. त्यानंतर मी माझी प्रतिमा पुसण्याचे अनेक प्रयत्न केले. काही चित्रपट आणि मालिकांमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या. पण तरीही तब्बल तीन दशकांनंतर देखील माझी श्रीरामाची प्रतिमा अजून पुसली गेलेली नाही.

 

या कार्यक्रमात पुढे अरुण गोविल यांनी सांगितले की, रामायण मालिकेच्या अपार लोकप्रियतेनंतर त्यांना अनेक बॉलिवूड पार्ट्यांमध्ये आमंत्रित केले जायचे. अशाच एका पार्टीत त्यांनी काही मोठमोठ्या अभिनेत्यांना त्यांच्याकडे आदराने बघत असल्याचे पाहिले. या कलाकारांमध्ये श्रीदेवी आणि जयाप्रदा या दोघीही होत्या. त्यांनी हात जोडून अरुण गोविल यांचे स्वागत केले होते. रामायण मालिकेमुळे त्यांना मिळालेला हा सन्मान होता.

टॅग्स :रामायण