Join us  

आधी नवऱ्याने दिला दगा, आता मुलाचा धक्का; काय असेल अरुंधतीचं पुढचं पाऊल?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 11:33 AM

‘आई कुठे काय करते’ ही मालिका आता खूपच वेगळ्या वळणावर आली आहे.

‘आई कुठे काय करते’ ही मालिका आता खूपच वेगळ्या वळणावर आली आहे. अरुंधतीला आधी पतीने धोका दिला आणि आता मुलाने धक्का दिलाय. त्यामुळे अरुंधतीचं आयुष्यच आता ढवळून निघाले आहे. अनिरुद्धसह २५ वर्षे संसार केल्यानंतर अरुंधतीच्या पदरी अखेर विश्वासघात पडलाय तर, दुसरीकडे ज्या मुलासाठी अख्खं आयुष्य अरुंधतीने वेचले आहे, त्याच मुलाने तिला तोंडघशी पाडले आहे.

अरुंधती ही नेहमीच आपल्या मुलांसाठी ढालीसारखी उभी राहिलीय. आपल्या मुलावर कुठलंही वादळ आलं तर त्या वादळाचा सामना अरुंधतीनेही केलाय आणि आपल्या मुलांना त्यातून बाहेर काढलंय. जेव्हा अंकिताने अभीशी साखरपुडा मोडला. तेव्हा अभीला सावरण्यासाठी अरुंधतीने मायेचा पदर दिला. दु:खातून सावरण्यासाठी त्याला आपला खांदा दिला आणि  अलगद त्याचा हात  अनघाच्या हातात दिला. अभीनेदेखील अरुंधतीच्या निर्णयाचा आदर केला. तो देखील एका आज्ञाधारक मुलाप्रमाणे अरुंधतीच्या विचारांशी मिळतेजुळते घ्यायला लागता होता. त्यामुळे तो अनघाचा लाईफ पार्टनर म्हणून स्वीकार करतो आणि ‘चट मंगनी पट ब्याह’साठी तयार होतो. पण अंकिता अभीला सोडायला काही तयार नसते. त्यामुळे अभी- अनघाच्या ऐन साखरपुड्यात अंकिता आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते आणि परत अभी साखरपुडा अर्धवट सोडून अंकिताकडे धावत जातो. 

इकडे अरुंधती आणि अनघाला विश्वास असतो, अभी परत येईल आणि साखरपुडा होईल. पण अरुंधती आणि अंकिताच्या विश्वासाला तडा जातो. कारण अभी घरी तर येतो पण, अंकिताला घेऊनच. अंकिताशी लग्न करून अभी अरुंधती अनघासह सगळ्यांच धक्का देतो.

मुलाने आपल्या नकळत लग्न केलंय हे जेव्हा आई वडिलांना कळतं तेव्हा त्यांच्यासाठी हा सगळ्यात मोठा धक्का असतो. पण अभीचं असं वागणं अनाकलनीय आहे. एक आज्ञाधारी मुलगा, स्वत:चे निर्णय कधीच ठामपणे घेऊ न शकणारा असं त्याचं व्यक्तिमत्व मालिकेतून आजवर दाखवण्यात आलं होतं. मग अचानक परस्पर त्याने अंकिताशी लग्न करण्याचा निर्णय घेणे हे प्रेक्षकांना काही रुचलेले नाही. या ट्विस्टनंतर आता ही मालिका कोणते नवे वळण घेणार आणि अरुंधतीसाठी पुढचे पाऊल काय असणार याकडे आता प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकास्टार प्रवाह