Join us

आप के आ जाने से या मालिकेद्वारे सुहासी धामी करणार कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 10:55 IST

आपली वृद्ध माता आणि १५ वर्षांची मुलगी यांची काळजी घेणारी वेदिका माथूर ही ४२ वर्षांची स्त्री तर साहिल अगरवाल ...

आपली वृद्ध माता आणि १५ वर्षांची मुलगी यांची काळजी घेणारी वेदिका माथूर ही ४२ वर्षांची स्त्री तर साहिल अगरवाल हा २४ वर्षांचा जीवनावर प्रेम करणारा तरुण. साहिल आपल्याच मस्तीत इतका मश्गुल झालेला असतो की, इतरांच्या मते त्याला जीवनात कसलेही ध्येय नसते किंवा कोणतेही लक्ष्यही नसते. या दोघांमध्ये कोणतेही साम्य नसताना ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. ‘आप के आ जाने से’ या ‘झी टीव्ही’वरील आगामी मालिकेत प्रेक्षकांना एक आगळी वेगळी प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. प्रेमात पडण्यासाठी परवानगीची गरज असते का हे या मालिकेद्वारे विचारण्यात येणार आहे. ‘बोधी ट्री प्रॉडक्शन्स’ची निर्मिती असलेली ‘आप के आ जाने से’ ही मालिका लवकरच ‘झी टीव्ही’वर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेत अनेक नामवंत कलाकार प्रमुख भूमिकेत असून वेदिका माथूरची भूमिका सुहासी धामी आणि साहिल अगरवालची भूमिका करण जोटवाणी साकारणार आहेत. सुहासी धामीने ‘झी टीव्ही’वरील ‘यहाँ मैं घर घर खेली’ या लोकप्रिय मालिकेत स्वर्ण आभाची भूमिका रंगविली होती. आता तब्बल तीन वर्षांनी ती छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. याविषयी ती सांगते, “इतक्या वर्षांनंतर झी टीव्हीवरील मालिकेत पुन्हा काम करण्याची संधी मिळत आहे, ही माझ्यासाठी फारच आनंदाची गोष्ट आहे. ‘आप के आ जाने से’ या मालिकेतून एक सशक्त संदेश अगदी साध्या पद्धतीने दिला जाणार आहे. वेदिकाची भूमिका ही कणखर इच्छाशक्ती असलेल्या स्त्रीची आहे. तिला ज्या गोष्टींवर विश्वास असतो, तीच गोष्ट ती करते, तरीही तिच्या इच्छा या समाजमान्यतेच्या चौकटीत बसणाऱ्या आहेत. वेदिकेच्या व्यक्तिरेखेला असलेले अनेक पदर उलगडताना माझ्यातील अभिनयगुणांचाही कस लागणार आहे.”कानपूरमध्ये घडणाऱ्या या मालिकेच्या कथानकात भिन्न कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या आणि वेगवेगळ्या वयोगटातील वेदिका आणि साहिल या दोन व्यक्ती सर्व अडचणींना तोंड देत एकमेकांच्या प्रेमात पडतात. जेव्हा या दोघांची आयुष्ये एकमेकांमध्ये गुरफटतात, तेव्हा वेदिका आणि साहिल यांनी स्वत:वर घालून घेतलेल्या बंधनांना तोडावे लागते आणि आपल्याला दुसऱ्याबद्दल मनापासून प्रेम वाटते, ही गोष्ट कबूल करावी लागते. आपण एकमेकांवर प्रेम करतो, ही गोष्ट मान्य करण्याचे धैर्य ते गोळा करतील? ‘लोक काय म्हणतील?’ या निरंतर प्रश्नाला सामोरे जाताना ते समाजाच्या विरोधात उभे ठाकतील काय? या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना या मालिकेत मिळणार आहेत.