Join us  

भाऊ कदमची कुटुंबासोबत जंगल सफारी, 'चला हवा येऊ द्या'चं शेवटचं शूट संपवून निघाला ट्रीपवर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 4:22 PM

भाऊ कदमने दाखवली ताडोबा जंगल सफारीची झलक

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' चा शेवटचा भाग नुकताच शूट झाला. गेल्या १० वर्षांपासून कार्यक्रमाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. दशकपूर्ती साजरी करताच कार्यक्रमाचा शेवटही झाला. निलेश साबळे, भाऊ कदम, सागर कारंडे, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे हे कलाकार घराघरात पोहोचले. त्यांनी सर्वांनाच अगदी खळखळून हसवलं. भाऊ कदम (Bhau Kadam) शूट संपताच कुटुंबासोबत ट्रीपवर निघाला. त्याने नागपूर दौऱ्यातील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत. 

विनोदाचा स्टार भाऊ कदम 'चला हवा येऊ द्या' मुळे घराघरात पोहोचला. त्याच्या विनोदाच्या अचूक टायमिंगमुळे प्रेक्षक प्रभावित झाले. कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवसाचं शूट संपताच भाऊ कदम नागपूरला गेला आहे. तिथे त्याने आधी कुटुंबासोबत दीक्षाभूमीचं दर्शन घेतलं. तेथील फोटोही त्याने पोस्ट केले. यानंतर भाऊ थेट ताडोबा अंधारी टायगर रिझर्व्ह येथे पोहोचला. आजच त्याने पहिल्या जंगल सफारीचा एक व्हिडिओ पोस्ट केला. यामध्ये त्यांना वाघाने दर्शन दिल्याचं पाहायला मिळतंय.

भाऊ कदमच्या पोस्टवर भरपूर लाईक्स आणि प्रतिक्रिया मिळत आहेत. 'दोन वाघ सोबतच' अशा कमेंट्स त्याच्या चाहत्यांनी केल्या आहेत. 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाने तर आता निरोप घेतला आहे. त्यामुळे या कलाकारांना आता आणखी कुठे पाहता येणार याचीच उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.

टॅग्स :भाऊ कदममराठी अभिनेताचला हवा येऊ द्यानागपूर