Join us  

Independence day : कलाकारांनी दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 11:28 AM

प्रजाकसत्ता दिनाच्या निमित्ताने झी टिव्हीवरील कलाकारांनी समस्त देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  

प्रजाकसत्ता दिनाच्या निमित्ताने झी टिव्हीवरील कलाकारांनी समस्त देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  ‘ये तेरी गलियाँ’मध्ये ब्युटीची व्यक्तिरेखा साकारणारी रेनी ध्यानी म्हणाली, “स्वातंत्र्यदिन म्हटला की मला माझे  शाळेतील दिवस आठवतात. त्या दिवशी आम्ही सर्व विद्यार्थी शाळेच्या पटांगणात आतुरतेने झेंडावंदनाची प्रतीक्षा करीत असू आणि त्यानंतर राष्ट्रगीत गात असू. ते गाताना आमचं मन अभिमानाने भरून येत असे. मी मोठी झाले, तसं मला स्वातंत्र्याचा खरा अर्थ कळला आणि आपल्या देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या बलिदानाचं महत्त्व कळलं. माझ्या सर्व चाहत्यांना माझ्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा आणि देशात सुधारणा करण्यासाठी त्यांनी आपल्या परीने हातभार लावावा, असं मी त्यांना आवाहन करते.”

‘ये तेरी गलियाँ’मध्ये पुचकीची व्यक्तिरेखा साकारणारी वृशिका मेहता म्हणाली, “मला देशभक्तीपर चित्रपट पाहण्यास फार आवडतात कारण ते आपल्याला आपल्या देशाच्या इतिहासाबद्दल बरंच काही शिकवतात आणि स्वातंत्र्यदिनाचं महत्त्व काय, तेही सूचित करतात. विचार, उच्चार आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य मिळाल्यामुळे आपण खरोखरच स्वत:ला सुदैवी मानलं पाहिजे आणि या स्वातंत्र्याचा आदर केला पाहिजे. यंदाच्या स्वातंत्र्यदिनी या कष्टाने मिळविलेल्या स्वातंत्र्याचा आणि शांततेचा आपण सर्वांनी आनंद घेऊया.”

‘कलीरें’मध्ये मीराची भूमिका रंगविणारी आदिती शर्मा म्हणाली, “आपल्याला निवड करण्याचा पर्याय उपलब्ध असून या स्वातंत्र्याचं महत्त्व मी वैयक्तिक स्तरावर खूप मोठं मानते. एक राष्ट्र म्हणून आपण प्रगती केली आहे, पण समाजातील अनेक अनैतिक आणि अन्याय्य प्रथा आणि रूढी यांचा शेवट करण्यासाठी आपल्यला वैयक्तिक स्तरावर काम करण्याची गरज आहे. त्या जेव्हा नष्ट होतील, तेव्हाच आपण स्वातंत्र्याचा खऱ्या अर्थाने आनंद घेऊ शकू. सर्वांना माझ्यातर्फे स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!”

‘कलीरें’मध्ये विवानची भूमिका साकारणारा अरिजित तनेजा म्हणाला, “या देशाचे नागरिक असलो, तरी प्रचंड कष्टाने मिळविलेलं हे स्वातंत्र्य आपण गृहित धरता कामा नये आणि त्याचा आदर करण्यास आपण शिकलं पाहिजे. आपला देश स्वतंत्र असला, तरी अजूनही भ्रष्टाचार, हुंडा, स्त्रीभ्रूण हत्या, कौटुंबिक हिंसाचार यासारख्या कुप्रथा समाजाला ग्रहण लावीत असून त्यामुळे स्वातंत्र्याचा खर्‍्या अर्थाने आनंद घेता येत नाही. आपल्या देशाला प्रगती करायची असेल, तर या समस्या आपल्याला नष्ट केल्या पाहिजेत. येत्या स्वातंत्र्यदिनी एकमेकांना साथ देण्याची आणि प्रेम आणि विधायक कामाने आपले जीवन उजळून टाकण्याची शपथ आपण घेऊया.”

‘झिंदगी की महेक’मध्ये शौर्यची भूमिका रंगविणारा करण व्होरा म्हणतो, “स्वातंत्र्यदिन हा देशाचं स्वातंत्र्य साजरा करण्याचा दिवस आहे. आपल्या तिरंग्यातील प्रत्येक रंगाला एक अर्थ असून ते रंग तिथे का आहेत, याचं एक कारण आहे. भगवा हा ताकद आणि त्यागाचं प्रतीक असून पांढरा रंग शांततेचं प्रतीक आहे. हिरवा रंग विकास आणि सुपीकतेचं प्रतीक आहे. या सर्व रंगांच्या प्रतीकांचं आपल्या जीवनात प्रतिबिंब पडलं पाहिजे आणि त्याद्वारे आपल्याकडे कोणीही वाकड्या नजरेनं पाहू शकणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. ज्या देशात आपण राहतो त्याबद्दल आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आणि आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत आपण त्याचं रक्षण केलं पाहिजे.”

‘इश्क सुभान अल्ला’मध्ये कबीरची भूमिका साकारणारा अदनान खान म्हणाला, “भारताच्या इतिहासात स्वातंत्र्यदिनाचं ऐतिहासिक महत्त्व असून त्याचं महत्त्व काय ते आपण जाणून घेतलं पाहिजे. एक देश म्हणून जरी आपण स्वतंत्र असलो, तरी आजही आपल्या देशातील महिलांना त्यांनी कोणते कपडे घातले पाहिजेत आणि त्यांनी काय कलं पाहिजे या गोष्टी सांगितल्या जातात. आपल्या समाजात आजही असमानता, स्त्रीभ्रूणहत्या, हुंडा तसंच आणखीही अनेक वाईट प्रथा असून एक स्वतंत्र देश या नात्याने आपण या कुप्रथांच्या शृंखला तोडून वर गेलं पाहिजे. हे जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत आपण खरं स्वातंत्र्य मिळविलं आहे, असं म्हणता येणार नाही. आपलं आयुष्य कसं जगायचं हे ठरविण्याचा अधिकार प्रत्येकाला असून आपण त्याचा आदर केला पाहिजे. आपण आपली प्रगती बुध्दिमान केली पाहिजे आणि स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्यागाचा आदर राखला पाहिजे. शेवटी माझ्याकडून सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”

‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ’चा सूत्रसंचालक शंतनू माहेश्वरी म्हणतो, “शाळेत असताना माझ्यासाठी स्वातंत्र्यदिन म्हणजे केवळ एक सुटीचा दिवस होता आणि मी तो दिवसभर खेलून आणि मजा करून व्यतीत करीत असे. मोठा झाल्यावर मला नृत्याच्या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्त्व करण्याची संधी मिळाली आणि मग माझा सारा दृष्टिकोनच पालटला. आपला देश स्वतंत्र आहे, या गोष्टीचं मोल आपण जाणलं पाहिजे. हा देश स्वतंत्र करण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांना अपरिमित संघर्ष आणि प्रयत्न करावा लागला होता आणि स्वातंत्र्यदिन त्यालाच समर्पित असतो.  सर्वांना माझ्याकडून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा आणि आपलं पर्यावरण आणि परिसर स्वच्छ ठेवण्याचं आवाहन मी सर्वांना करतो.”

‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ’चा परीक्षक उमंगकुमार म्हणतो, “समाजातील मूठभर हितसंबंधियांच्या नव्हे, तर जास्तीत जास्त लोकांच्या हितासाठी काम करणं म्हणजेच खरं स्वातंत्र्य. आज आपण ज्या स्वातंत्र्यचा अनुभव घेत आहोत, ते आपल्याला आपल्या बहादुर सैनिकांनी आणि स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या असीम त्याग आणि संघर्षामुळे मिळालं आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आता भावी पिढ्यांना एक समृध्द आणि उज्ज्वल भवितव्य देण्यासाठी आपण या स्वातंत्र्याचा उपयोग केला पाहिजे.”