Join us  

'लागिरं झालं जी'नंतर शिवानी बावकर आणि नितीश चव्हाणची जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2020 8:00 AM

लागिरं झालं जी या मालिकेतील मुख्य भूमिकेत असलेले शीतली आणि अज्या म्हणजेच शिवानी बावकर आणि नितीश चव्हाण ही जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

झी मराठी वाहिनीवरील मालिका लागिरं झालं जीने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी या मालिकेतील प्रत्येक कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात घर कायम केले आहे. या मालिकेतील मुख्य भूमिकेत असलेले शीतली आणि अज्या म्हणजेच शिवानी बावकर आणि नितीश चव्हाण ही जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मात्र यावेळेला मालिकेत नाही तर ते दोघे एका गाण्यातून रसिकांच्या भेटीला आला आहे. 

प्रेम ही भावना मनात तरंग उमटवणारी आहे. असेच एक प्रेमगीत अभिनेत्री शिवानी बावकर आणि अभिनेता नितीश चव्हाण प्रेक्षकांच्या भेटीस एका आगळ्या वेगळ्या अंदाजात घेऊन येत आहेत. 'एव्ही प्रॉडक्शन'प्रस्तुत  'मन उनाड' या यशस्वी गाण्यानंतर त्यांचे हे नवेकोरे 'चाहूल' गाणं नक्कीच प्रेमाची चाहूल लावणारे आहे.

'एव्ही प्रॉडक्शन'सह 'मराठी म्युझिक टाऊन' या म्युझिक लेबलने ही या गाण्याला प्रस्तुत केले असून या म्युझिक लेबल अंतर्गत असलेले हे पहिलेवहिले गाणे आहे.

'एव्ही प्रॉडक्शन' आणि 'मराठी म्युझिक टाऊन'प्रस्तुत मंगल पी, अभिजित आणि विश्वजित निर्मित तर दिग्दर्शक ओंकार माने दिग्दर्शित या सुमधुर संगीताला दिलेली नृत्याची जोड अगदी प्रसन्न करून सोडणारी आहे. ओंकार याआधी 'बेखबर कशी तू' या म्युझिक व्हिडिओ मधून प्रेक्षकांच्या भेटीस आला.

याशिवाय 'चंद्र झुल्यावर', 'तू ये साथीला' याही गाण्यांची दिग्दर्शनाची धुरा ओंकारने साकारली. तसेच निर्माता विश्वजितचे हे मराठी सृष्टीतील दुसरे निर्मित केलेले मराठी गाणे असून याआधी त्याने 'दिल बुद्धू' या हिंदी गाण्यातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. आपल्या दमदार आणि सुमधुर आवाजात गायक विजय भाटे याने हे गाणे गायले आहे तर गाण्याचे बोल  राहुल थोरात यांचे असून संगीतकार आशिष आणि विजय यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे. शिवानी आणि नितीशची सुप्रसिद्ध जोडी पुन्हा एकदा 'चाहूल' या गाण्यातून सर्व प्रेमीयुगुलांसाठी एक पर्वणीच ठरेल.

टॅग्स :शिवानी बावकर