‘कुमकुम भाग्य’मालिकेत येणार 7 वर्षाचा लिप,पाहायला मिळणार रंजक वळण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 13:53 IST
‘झी टीव्ही’वरील सर्वाधिक लोकप्रिय मालिका असलेल्या ‘कुमकुम भाग्य’ने प्रेक्षकांची मने काबीज केली असून या मालिकेचे कथानक आणि त्यातील व्यक्तिरेखांना ...
‘कुमकुम भाग्य’मालिकेत येणार 7 वर्षाचा लिप,पाहायला मिळणार रंजक वळण
‘झी टीव्ही’वरील सर्वाधिक लोकप्रिय मालिका असलेल्या ‘कुमकुम भाग्य’ने प्रेक्षकांची मने काबीज केली असून या मालिकेचे कथानक आणि त्यातील व्यक्तिरेखांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे.टीव्ही मालिकांची सम्राज्ञी एकता कपूरची निर्मिती असलेल्या या मालिकेत शब्बीर अहलुवालिया आणि श्रृती झा हे प्रमुख भूमिकेत आहेत.भावभावनाआणि नातेसंबंध यांचे विविध पैलूंचा वेध घेणार्या या मालिकेने प्रसारणास प्रारंभ झाल्यापासून उत्कृष्ट प्रेक्षकसंख्येचा आपला आलेख कायम उंच राखला आहे.मालिकेतील ग्लॅमरचे वलय लाभलेला रॉकस्टार अभी (शब्बीर अहलुवालिया) आणि चष्मा वापरणारी,सामान्य घरातील मुलगी प्रज्ञा (ॠती झा) या नायक-नायिकेची प्रतिमा अगदी परस्परविरोधी असूनही गेल्या तीन वर्षांत या जोडप्याने टीव्हीवरील सर्वात लाडके जोडपे बनण्याचा मान संपादन केला आहे.आपल्या देदीप्यमान,ग्लॅमरस प्रवासात या मालिकेने नुकतेच एक हजार भागांचा टप्पा गाठला आहे.आता आपल्या एक हजार भागांच्या टप्प्यात प्रथमच मालिकेच्या कथानकाचा काळ सात वर्षांनी पुढे नेण्यात येणार असल्याने प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसेल.यानंतर अभी आणि प्रज्ञा यांच्यातील नात्यात आमूलाग्र बदल झालेला दिसून येणार असून मिशाल सिंह या टीव्हीवरील आणखी एका लाडक्या अभिनेत्याचा या मालिकेत किंग सिंहच्या भूमिकेद्वारे प्रवेश होईल.एक यशस्वी रॉकस्टार असलेला किंग सिंह हा जीवनापेक्षा भव्य प्रतिमा असलेला प्रचंड ग्लॅमरस आणि आलीशान व्यक्ती असतो.स्टेजवर कार्यक्रम सादर करताना तो आपल्या वैशिष्ट्यपूर्ण परंतु विक्षिप्त शैलीने सर्वांवर प्रभाव टाकीत असे.मुख्य म्हणजे,तो स्वत:च आपल्या प्रेमात बुडालेला असल्याने त्याला प्रसिध्दीचा सारा झोत सतत स्वत:वरच पडलेला हवा असतो.आता लंडनमधील प्रेक्षकांची मने जिंकल्यावर किंग सिंह भारतातील प्रेक्षकांवर आपली जादू टाकण्यासाठी येथे येतो.या मालिकेतील आपल्या प्रवेशाबद्दल गुणी अभिनेता मिशाल रहेजाने सांगितले, “बालाजी प्रॉडक्शन्सच्या अतिशय यशस्वी अशा कुमकुम भाग्यसारख्या मालिकेचा भाग बनण्याचे भाग्य मला लाभले आहे.मला सेटवरचं वातावरण फार आवडतं आणि तिथे गेल्यावर माझ्या शरीरात उठणा-या चैतन्याच्या अनुभवाला दुसरी उपमाच देता येणार नाही.किंग सिंहचं व्यक्तिमत्त्व विक्षिप्त असलं, तरी त्याच्या व्यक्तिमत्त्वाला विविध पैलू असून ते साकार करणं तितकं सोपं नाही.आता तो भारतात आला असून तिथे तो अभीला (शब्बीर अहलुवालिया) आव्हान देऊन त्याचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी बनणार असतो.जगभरातील असंख्य प्रेक्षकांची लाडकी मालिका असलेल्या 'कुमकुम' भाग्यमध्ये भूमिका साकारण्याची संधी मिळतअसल्याबद्दल मला फार आनंद आणि अभिमान वाटतो आहे.प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास मी उतावीळ झालो आहे.” किंग सिंहच्या प्रवेशामुळे अभी आणि प्रज्ञा यांच्या जीवनाला अनेक कलाटण्या मिळतात आणि त्यामुळे हे प्रेमीयुगुल पुन्हा कधी एकत्र येईल की नाही, याविषयी शंका निर्माण होत आहे.