‘गरिबी हटाव’ पासून ते ‘अच्छे दिन’पर्यंतचा राजकीय प्रवास झाला; पण सामान्य माणसाची जगण्याची लढाई चालूच आहे. मध्यमवर्गीय जाणिवांना स्पर्शही होणार नाही, अशी हतबलता गरिबी आणते, याचे भेदक चित्रण ‘गणवेश’मध्ये आहे. ‘बायसिकल थिव्ह्ज’ नावाचा एक चित्रपट गाजला होता. त्यातील बाप-लेकांचीच गोष्ट पुढे जाते आहे, असे ‘गणवेश’ पाहिल्यावर वाटते. एका बाजूला हे सगळे कारुण्य पडद्यावर दाखवत असताना गणेवेशाच्या बाबतीत प्रत्येकाच्या भावना कशा असतात, आठवणी कशा गुंफलेल्या असतात, हेदेखील मनोहारी पद्धतीने मांडले आहे.गरिबीच्या शिडीतील अगदी शेवटचा घटक म्हणजे वीटभट्टीवर राबणारा मजूर. अशाच एका कुटुंबाची ही कथा. सुरेश (किशोर कदम) आणि छाया (स्मिता तांबे) हे दोघेही वीटभट्टीवर काम करणारे मजूर जोडपे असते. त्यांच्या मुलाची म्हणजेच मधुकरची (तन्मय मांडे) शाळेत स्वातंत्र्य दिनी भाषण करण्यासाठी निवड होते. १५ आॅगस्ट रोजी शाळेत शिक्षणमंत्री येणार असतात, त्या वेळी भाषण करणाऱ्या मुलांनी नवीन गणवेश परिधान करणे गरजेचे असते आणि मधुकरकडे फाटका गणवेश असतो. आई-वडिलांकडे मधुकर नव्या गणवेशाची मागणी करतो अन् बाप मायेपोटी त्याला नवीन गणवेश घेऊन देण्याचा शब्द देतो.गणवेश घेण्यासाठी बाजारात जाऊन दुकानांची टेहळणी करणाऱ्या सुरेशला पोलीस चोर म्हणून पकडून नेतात. घरी मुलगा नव्या गणवेशाची वाट पाहत असतो. चौकीतून सुटल्यावर वीटभट्टी मालकाला पैसे मागायला गेल्यावर त्याचे अन् मालकाचे वाद होतात व हातचे काम सुटते. गावाच्या एका राजकारण्याकडे (नागेश भोसले) गणवेशासाठी मदत मागायला गेल्यावरसुद्धा त्याच्या पदरी निराशाच येते.किशोर कदम यांनी साकारलेला हतबल बाप गहिवरून टाकतो. मुलावरील प्रेम, पण गरिबीमुळे आलेली विवशता दाखविताना अभिनय कोठेही लाउड होणार नाही, याची खबरदारी त्यांनी घेतली आहे. उलट, पैसे मागतानाची लाचारी दाखवितानाची त्यांची देहबोली पाहिल्यावर संवादाची गरजच उरत नाही. ‘बैल’नंतर स्मिता तांबे यांची आईची ही दुसरी भूमिका. आईचे कारुण्य दाखवितानाच पतीबाबत असणारी जबाबदारी दाखवितानाचा त्यांचा अभिनय लाजवाब आहे. मुक्ता बर्वेने पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका अगदी झोकात केली आहे. मात्र, या पात्रामागची कारणमीमांसा मात्र शेवटपर्यंत उलगडत नाही. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी शिक्षणमंत्र्यांची भूमिका हातखंडा साकारली आहे. मधुकर (तन्मय मांडे) या बालकलाकाराभोवती हा संपूर्ण चित्रपट फिरतो. जिद्द, आत्मविश्वास, बोलकेपणा त्याने प्रभावीपणे दाखविले आहेत. छायाचित्रकार म्हणून प्रसिद्ध असलेले अतुल जगदाळे यांचा हा पहिलाच चित्रपट. कथाही त्यांची आहे. सिनेमॅटिक भाषेची त्यांची जाण प्रत्येक प्रसंगातून दिसते. विशेषत: किशोर कदम आणि तन्मयचे काही प्रसंग अगदी डोळ्यांत पाणी आणतात. दिग्दर्शनाचा पहिलाच अनुभव असूनही कोठेही नवखेपणा जाणवत नाही. मध्यमवर्गीय जाणिवांवर ओरखडा ओढणारी एका वेगळ्या संघर्षाची ही कहाणी प्रत्येकानेच अनुभवावी अशी आहे.
गरिबीतील जगण्याच्या संघर्षाची कहाणी
By admin | Updated: June 25, 2016 01:40 IST