Join us  

'बलात्कार मुक्त महाराष्ट्र'; तृप्ती देसाई नव्या आंदोलनाच्या तयारीला!

By शर्वरी जोशी | Published: November 08, 2021 1:21 PM

Trupti desai: महिलांच्या हक्कासाठी, न्यायासाठी कायम झटणाऱ्या तृप्ती देसाई (trupti desai) यांनी कंबर कसली आहे. 'बलात्कारमुक्त महाराष्ट्र' करण्याच्या नवा ध्यास त्यांनी घेतला आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये स्त्रियांवर होणारे घरगुती हिंसाचार, बलात्कार या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या देशात, राज्यात बलात्काराविषयी जनजागृती, समुपदेशन करण्यासाठी अनेक जण प्रयत्नशील आहेत. यामध्येच आता महिलांच्या हक्कासाठी, न्यायासाठी कायम झटणाऱ्या तृप्ती देसाई (trupti desai) यांनी कंबर कसली आहे. 'बलात्कारमुक्त महाराष्ट्र' करण्याच्या नवा ध्यास त्यांनी घेतला आहे. त्यामुळे बिग बॉसच्या (bigg boss) घरातून बाहेर पडल्यानंतर त्या 'बलात्कारमुक्त महाराष्ट्र' या आंदोलनाकडे वळल्या आहेत. याविषयी 'लोकमत ऑनलाइन'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या आंदोलनाची रुपरेषा सांगितली आहे.

"आतापर्यंत आपण स्त्री-पुरुष समानता, मंदिरातील स्त्रियांचा प्रवेश यावर आंदोलन केली होती. परंतु, आता याहून जास्त महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे बलात्कार. लहान लहान मुलींवरही बलात्कार केले जात आहेत. आणि, हे कुठेही थांबत नाहीये. त्यामुळे आमचं पुढचं आंदोलन हे बलात्कारमुक्त महाराष्ट्र हे असेल," असं त्या म्हणाल्या.

Exclusive: "हो, मी राजकारणात जाणार..." 'बिग बॉस'मधून बाहेर पडताच तृप्ती देसाईंनी केली घोषणा 

पुढे त्या म्हणतात, "बलात्काराविषयीची जनजागृती मला राज्यभरात करायची आहे. जिल्हा,तालुका, गाव या सगळ्या स्तरांवर मला जायचंय. महिलांबाबतची तुमची मानसिकता काय? ही राक्षसी प्रवृत्ती कुठून येते? महिलांनी सुद्धा न घाबरता दुर्गेचं रुप धारण करुन रस्त्यावर उतरलं पाहिजे. याचसाठीच कोणी तरी पुढाकार घेऊन नेतृत्व करणं गरजेचं आहे." 

महाराष्ट्रातील 'या' भागात होणार 'बलात्कार मुक्त महाराष्ट्र'चं आंदोलन

मराठवाडा,विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र असे जे काही भाग आहेत. त्यातील प्रत्येक जिल्हा, तालुका, गाव प्रत्येक ठिकाणी जाणार आहे. वेळ लागेल. पण जीवाचं रान करायची माझी तयारी आहे. कारण, आपला महाराष्ट्र बलात्कारमुक्त झाला पाहिजे यासाठी माझे प्रयत्न असतील. ज्यावेळी आम्ही कृतीत उतरु त्यावेळी हा मोठा फरक झालेला दिसेल.

'बलात्कार मुक्त महाराष्ट्र'ची योजना कधी ठरली?

८ मार्च २०२१ मध्ये मी आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानंतर एप्रिलमध्ये लॉकडाउन लागला. त्याचवेळी मी बिग बॉसच्या घरात दिसले. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने कृतीत उतरण्याची वेळ आली आहे. म्हणूनच, बिग बॉसच्या माध्यमातून मी या आंदोलनाची माहिती दिली.  

टॅग्स :तृप्ती देसाईमहाराष्ट्रबिग बॉस मराठीसेलिब्रिटी