Join us  

Vijay chavan death : विजय चव्हाण यांनी कधीच वापरला नाही मोबाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 2:48 PM

विजय चव्हाण यांचे राहाणीमान हे एखाद्या सामान्य माणसाप्रमाणेच होते. एवढेच नव्हे तर आजकाल सगळ्यांची गरज मानला जात असलेला मोबाईल देखील ते कधीच वापरत नव्हते.

विजय चव्हाण हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक नामवंत अभिनेते होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपट, मालिका, नाटकांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या. विजय चव्हाण हे रंगभूमीवरील राजा असले तरी ते खऱ्या आयुष्यात खूपच साधे होते. ते गेल्या कित्येक वर्षांपासून मुलुंडला राहात आहेत. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि मुलगा वरद आहेत. विजय चव्हाण यांचे राहाणीमान हे एखाद्या सामान्य माणसाप्रमाणेच होते. एवढेच नव्हे तर आजकाल सगळ्यांची गरज मानला जात असलेला मोबाईल देखील ते कधीच वापरत नव्हते. त्यांच्या घरातील लँडलाइन नंबरवर फोन करून त्यांच्याशी संपर्क साधावा लागत असे किंवा त्यांचा मुलगा वरद याच्या फोनवर त्यांच्यासाठी फोन करावा लागत असे. विजय चव्हाण चित्रीकरणाच्या, नाटकाच्या दौऱ्यांसाठी नेहमीच मुंबईच्या बाहेर असत. पण तरीही त्यांनी कधीच मोबाईल वापरला नाही. मला मोबाईल वापरायला आवडतच नाही असे ते आवर्जून सांगायचे. 

ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं दीर्घ आजाराने आज सकाळी निधन झाले. मुलुंडच्या फोर्टीस रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्वास घ्यायला त्रास होत असल्याच्या तक्रारीनंतर बुधवारी (22 ऑगस्ट) विजय चव्हाण यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

विजय चव्हाण यांनी त्यांच्या अभिनयाने गेल्या अनेक वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टी गाजवली. चित्रपट, नाटकातील त्यांच्या अनेक भूमिकांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. मोरूची मावशी या नाटकात त्यांनी रंगवलेले स्त्री पात्र प्रेक्षक कधीचं विसरू शकत नाहीत. गेल्या कित्येक दिवसांपासून विजय चव्हाण आजारी होते. विजय चव्हाण यांचा जन्म लालबागमधला. मध्यमवर्गीय कुटुंबातील विजय चव्हाण लालबागमधील प्रसिद्ध भारतमाता चित्रपटगृहाच्या मागच्या बाजूला असलेल्या हाजी कासम चाळीत लहानाचे मोठे झाले. विजय चव्हाण यांनी त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण रुपारेल या कॉलेजमधून पूर्ण केले. कॉलेजमध्ये असताना ते अनेक एकांकिकांमध्ये भाग घेत असत. विजय चव्हाण यांना त्यांची पहिली एकांकिका विजय कदम यांच्यामुळे मिळाली. एकांकिकेमध्ये भाग घेणारा स्पर्धक ऐनवेळी काही कारणास्तव येऊ शकला नव्हता. पण त्या एकांकिकेच्या रंगीत तालमींना विजय चव्हाण नेहमी उपस्थित असायचे. त्यामुळे या एकांकिकेतील सगळे संवाद त्यांना पाठ होते. ही एकांकिका विजय चव्हाण खूप चांगल्याप्रकारे सादर करू शकतील असा विजय कदम यांना विश्वास होता आणि त्यामुळेच त्यांनी विजय चव्हाण यांचे नाव सुचवले. मोरूची मावशी हे विजय चव्हाण यांच्या कारकिदीर्तील सगळ्यात गाजलेले नाटक. या नाटकात त्यांनी मोरूची मावशी अप्रतिम रंगवली. हे नाटक त्यांना लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यामुळे मिळाले होते. खरे तर या नाटकासाठी लक्ष्मीकांत यांना विचारण्यात आले होते. पण हे नाटक प्रायोगिक रंगभूमीवर विजय चव्हाण सादर करत असत आणि हे नाटक लक्ष्मीकांत यांनी पाहिले होते. त्यांनीच या भूमिकेसाठी विजय चव्हाण योग्य असल्याचे निर्मात्यांना सांगितले होते.

विजय चव्हाण यांनी आतापर्यंत 350-400 चित्रपटांमध्ये काम केले. मोरूची मावशी, श्रीमंत दामोदर पंत ही त्यांची नाटकं प्रचंड गाजली आहेत. त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 1985 साली प्रदर्शित झालेल्या वहिनीची माया या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. झपाटलेला, पछाडलेला, भरत आला परत यांसारख्या अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. 

टॅग्स :विजय चव्हाणवरद चव्हाण