Join us  

 सुशांतच्या जाण्याचं नक्कीच दु:ख; पण आता बास्स झालं...! मराठी दिग्दर्शक केदार शिंदे संतापले!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2020 12:36 PM

थेट सवाल: हे जाणीवपुर्वक चाललंय का?

अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूप्रकरणाच्या तपासावरून मुंबई पोलिस व बिहार पोलिस आमने-सामने उभे ठाकले आहेत. मुंबई पोलिस या प्रकरणाचा तपास करत असताना बिहार पोलिसांनी या प्रकरणाचा समांतर तपास सुरु केला आहे. अशात मुंबई पोलिस बिहार पोलिसांना सहकार्य करत नसल्याचा एक आरोप सतत होत आहेत. या आरोपाच्या पार्श्वभूमीवर मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

‘ आता बास्स झालं. मुंबई पोलीस तुम्ही आमची शान आहात. सतत तुमच्या विषयी नकारात्मक बातम्या सुरु आहेत. कुणीही येतंय आणि टिकली वाजवून जातंय. तोंडावर त्यांना पुरावे देऊन या. सुशांत आत्महत्या प्रकरणाचा समारोप करा! तुमच्यावर आम्हाला गर्व आहे,’ असे ट्विट त्यांनी केले आहे. 

‘सुशांत सिंग राजपूतच्या जाण्याचं नक्कीच दु:ख आहे. त्याच्या केसचा छडा लावाच! पण या काही दिवसांमध्ये हिंदी/इंग्रजी/मराठी वृत्तवाहिन्यांवर फक्त त्याच्यावरचे एपिसोड पाहून चिंता वाटतेय. लोकांना वेगळ्याच घटनेत गुंतवून देशासमोरचे महत्वाचे विषय बाजूला सारले जात आहेत. हे जाणीवपुर्वक चाललंय का?,’ असाही सवालही केदार शिंदे यांनी उपस्थित केला आहे. केदार शिंदेची ही दोन्ही ट्विट सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत.सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी सुशांतच्या वडिलांनी एफआयआर दाखल केल्यानंतर बिहार पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. गेल्या काही दिवसांपासून बिहार पोलिसांची एक टीम मुंबईत तळ ठोकून आहेत. अशातच मुंबई पोलिसांकडून बिहार पोलिसांना सहकार्य मिळत नसल्याचे अनेक आरोप होत आहेत. या आरोपांवरून आता राजकारणही सुरू झाले आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी मुंबई पोलिसांवर टीका केली आहे.  

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतकेदार शिंदे