Join us  

- अन् 3 तास ट्रेनमध्ये अडकला सुबोध भावे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2019 4:31 PM

पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असताना अभिनेता सुबोध भावे यालाही पावसाचा फटका बसला.

ठळक मुद्देसुबोध भावेची ‘तुला पाहते रे’ ही मालिका चांगलीच गाजली होती.

मुंबई, ठाण्यात पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असताना अभिनेता सुबोध भावे यालाही पावसाचा फटका बसला. तीन तास त्याला ट्रेनमध्ये अडकून पडावे लागले. सुबोध विदर्भ एक्स्प्रेसमधून मुंबईत येत होता. मात्र पावसामुळे ही ट्रेन खोळंबली. अखेर त्याला टॅक्सी करून मुंबई गाठावी लागली. ट्वीट करून सुबोधने चाहत्यांशी ही माहिती शेअर केली. ‘विदर्भ एक्सप्रेसने मुंबईला येताना वाशिंद स्थानकावर गेली तीन तास अडकलो आहे. आत्ता टॅक्सी करून निघालो. पण मित्रांनो गरज नसेल तर घरातून बाहेर पडू नका. स्वत:ची आणि कुटुंबीयांची काळजी घ्या,’ असे ट्वीट त्याने केले. यानंतर ‘सुखरूप घरी पोचलो,’ अशी आणखी एक पोस्ट त्याने टाकली.

काही दिवसांपूर्वी अभिनेता सुबोध भावे याने प्रेक्षकांची काहीशी कानउघाडणी करणारी खरमरीत पोस्ट  सोशल मीडियावर टाकली होती. नाट्यप्रयोगादरम्यान मोबाइल खणखणण्याच्या त्रासावर संताप व्यक्त करीत, यापुढे नाटकात काम न करण्याचे त्याने म्हटले होते.   

सुबोध भावेची ‘तुला पाहते रे’ ही मालिका चांगलीच गाजली होती. झी मराठी वाहिनीवर अल्पावधीतच तुला पाहते रे मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात घर केले होते आणि जवळपास वर्षभरानंतर नुकताच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. विक्रांत सरंजामे व ईशा निमकर यांची प्रेमकथा प्रेक्षकांना खूपच भावली होती.      सुरूवातीला साधी, सोज्वळ ईशा अरूण निमकर व सरंजामे कंपनीचे प्रमुख विक्रांत सरंजामे यांच्या प्रेमकथेने रसिकांना  भुरळ पाडली. त्यानंतर या मालिकेत टर्न अँड ट्विस्ट आले. विक्रांत सरंजामे आणि ईशाचे लग्न झाले. ईशा हिच विक्रांतची पहिली बायको राजनंदिनीचा पुनर्जन्म असल्याचे सिद्ध झाले. शिवाय विक्रांत हाच राजनंदिनीला मारतो अशा बºयाच गोष्टी मालिकेत पाहायला मिळाल्या.  २० जुलैला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. 

टॅग्स :सुबोध भावे