Join us  

'पिप्सी' मांडणार अल्लड मैत्रीची परिभाषा  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 1:50 PM

राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झळकलेला 'पिप्सी' सिनेमा, येत्या २७ जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्राला, बालपणाच्या आठवणीत घेऊन जाणार आहे

ठळक मुद्देदर्जेदार कथानक आणि मांडणी असलेला या सिनेमाने महोत्सवांमध्ये आपली विशेष छाप पाडली आहे

राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झळकलेला 'पिप्सी' सिनेमा, येत्या २७ जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्राला, बालपणाच्या आठवणीत घेऊन जाणार आहे. लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल प्रस्तुत आणि निर्मित हा सिनेमा प्रेक्षकांना, 'चानी' आणि 'बाळू' यांच्या निरागस मैत्रीची अल्लड सफर घडवून आणणार आहे. बालपणीच्या निस्वार्थ मैत्रीचे महत्व मोठे झाल्यावरच कळून येते. त्यामुळेच तर 'बालपण देगा देवा' असे म्हणणाऱ्या प्रत्येकाला आपल्या बालमित्राची आठवण करून देणारा हा सिनेमा ठरणार आहे.   

लहान मुलांचे भावविश्व आणि वास्तविकतेकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन 'पिप्सी' सिनेमात आपल्याला पहायला मिळणार आहे. रोहन देशपांडे दिग्दर्शित या सिनेमात मैथिली पटवर्धन आणि साहिल जोशी हे दोन बालकलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे या सिनेमासाठी, मैथिलीला, यंदाच्या ५५ व्या राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट बालकलाकाराने सन्मानित करण्यात आले आहे.  सौरभ भावे लिखित'पिप्सी' या सिनेमात, समाजातील घडामोडीचा दोन लहानग्या मित्रांनी काढलेला निष्कर्ष आपल्याला पाहता येणार आहे. 

दर्जेदार कथानक आणि मांडणी असलेला हा सिनेमा चित्रपट महोत्सवांमध्ये आपली विशेष छाप पाडत आहे. यंदाच्या ५८ व्या झ्लीन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये या सिनेमाला विशेष ज्युरी पुरस्कार देण्यात आला असून, २०१८ सालच्या एन.आय.टी.टी.इ. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्येदेखील आणि नुकत्याच पार पडलेल्या १३ व्या बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठीदेखील 'पिप्सी' चित्रपट झळकला आहे.  इतकेच नव्हे तर, गतवर्षीच्या मामी हाफ तिकीट सेक्शनमध्ये आणि स्माईल आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलच्या बाल आणि तरुण विभागातदेखील ‘पिप्सी’ सिनेमाची खास स्क्रीनिंग झाली होती. अश्याप्रकारे विविध चित्रपट महोत्सवामधून मैत्रीच्या नात्याची परिभाषा जगासमोर मांडणारा ‘पिप्सी’ सिनेमा, आता महाराष्ट्राच्या प्रेक्षकांनादेखील आपलेसे करण्यास येत आहे.