Join us  

निशिगंधा वाड सांगतायेत, अवघ्या अकराव्या वर्षी गिरवले अभिनयाचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2016 4:26 PM

निशिगंधा वाड यांनी अनेक मराठी मालिका, चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकरल्या आहेत. केवळ मराठीच नव्हे तर हिंदा मालिका, बॉलिवूडमध्येही त्यांनी ...

निशिगंधा वाड यांनी अनेक मराठी मालिका, चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकरल्या आहेत. केवळ मराठीच नव्हे तर हिंदा मालिका, बॉलिवूडमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच त्यांनी अभिनय सांभाळून दोन विषयात पी.एच.डीदेखील केली आहे. अशा या अष्टपैलू अभिनेत्रीसोबत सीएनएक्सने मारलेल्या गप्पा...गेली अनेक वर्षं तुम्ही अभिनयक्षेत्रात आहात, तुमचा हा अभिनयाचा प्रवास कसा सुरू झाला?सहावीत असताना मला अभिनयाची राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली. त्यानंतर सुलभा देशपांडे यांच्या आविष्कार या संस्थेत मी अभिनयाचे धडे गिरवू लागली. मी खूपच लहान वयात नाटकांत काम करू लागले. मोरुची मावशी या नाटकात मी काम करत असताना मी केवळ दहावीला होते. मोरुच्या मावशीच्यावेळी तर मी कानात बोटे घालून अभ्यास करत असे कधी कधी तर यामुळे माझी एंट्रीदेखील चुकायची. पण अभ्यास आणि अभिनय या दोन्ही गोष्टींचा मी सुरुवातीपासून ताळमेळ घातला. मी मोहन वाघ यांच्यासोबत नाटक करत होती. त्यावेळी मी रुपारेल कॉलेजला होती. मला कॉलेजला दांड्या मारणे अजिबात आवडायचे नाही. त्यामुळे दौऱ्यावरून रात्री उशिरा आली की, मी मोहन काकांच्याच घरी राहायचे आणि सकाळी लवकर उठून कॉलेजला जायचे. त्यावेळी मोहन काकांच्या पत्नी अगदी मुलीप्रमाणे माझी काळजी घ्यायच्या. त्या मला कॉलेजला जाताना डबादेखील करून द्यायच्या. या सगळ्यात माझ्या कुटुंबाचादेखील मला तितकाच पाठिंबा मिळाला. माझे वडील आर्मीत होते. त्यांना आपल्या भारत सरकारकडून रक्षाचक्रदेखील मिळाले आहेत. तर माझी आई शिक्षिका. या दोघांकडून मिळालेल्या संस्कारामुळेच मी सगळ्या गोष्टी योग्यरितीने करू शिकले. रंगभूमीवर काम करत असताना तुम्ही मालिका आणि चित्रपटांकडे कशा वळल्या?मी जयवंत दऴवी यांच्या आवाहन या मालिकेत काम केले होते. या मालिकेने मला खरी ओळख मिळवून दिली. या मालिकेतील माझे काम आवडल्यामुळे मला अनेक ऑफर्स मिळायला लागल्या. कुणी तरी आहे तिथे हे माझे नाटक खूप गाजले होते. या नाटकामुळे मला एकापेक्षा एक हा माझा पहिला चित्रपट मिळाला. माझ्या पहिल्या चित्रपटाच्यावेळी तर मी बी.ए.च्या शेवटच्या वर्षाला होती. यानंतर मी शेजारी शेजारी चित्रपट केला. माझे हे दोन्हीही चित्रपट लागोपाठ प्रदर्शित झाले. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आणि मी मराठी चित्रपटसृष्टीत स्थिरावले. हिंदी मालिका आणि चित्रपटातदेखील तुम्ही नेहमीच खूप चांगल्या भूमिका साकरल्या आहेत. हिंदी इंडस्ट्रीत तुमचा प्रवेश कसा झाला?हिंदी इंडस्ट्रीमध्ये रंगभूमीवर काम करणाऱ्या मराठी कलाकारांना नेहमीच आदराचे स्थान आहे. त्यामुळे आज मराठी इंडस्ट्रीतील अनेकजण तिथे आपले एक वेगळे स्थान निर्माण करू शकले आहे. मी हृषिकेश मुखर्जी यांच्यासोबत नोकझोक, छोटी बहू यांसारख्या मालिका केल्या होत्या. हृषिकेश मुखर्जी यांच्यासोबत काम करण्याची मला संधी मिळाली हे मी माझे भाग्यच समजते. त्यानंतर मला हिंदीत अनेक मालिका, चित्रपटांच्या ऑफर्स मिळत गेल्या. आज अमिताभ बच्चन, सलमान खान, हृतिक रोशन या हिंदीतील सगळ्याच मोठ्या कलाकारांसोबत मी काम केले आहे.तुम्ही काम आणि घर यांच्यात ताळमेळ कसा घातला?माझे लग्न झाले तेव्हा मी अवघी 22-23 वर्षांची होती. पण माझ्या पतींनी मला खूप सांभाळून घेतले. माझी मुलगी लहान असताना तर मी तिला घेऊन चित्रीकरणाला जात असे. पण प्रवासामुळे तिला त्रास व्हायला लागला. त्यामुळे मी चित्रपट आणि मालिकांमधून काही महिन्यांचा ब्रेक घेतला आणि त्या दरम्यान माझी पहिली पीएचडी केली. सध्या तुम्ही एक माँ... जो लाखों के लिये बनी अम्मा या मालिकेत शबाना आझमींसोबत काम करत आहात त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे?शबाना आझमी केवळ एक कलाकारच नाही तर त्या एक माणूस म्हणूनही तेवढ्याच चांगल्या आहेत. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सगळ्याच कलाकारांचा त्या प्रचंड आदर करतात. मी लिहिते, हे ज्यावेळी त्यांना कळले, त्यावेळी त्यांनी मला कैफी आणि मी हे त्यांच्या आईने लिहिलेले पुस्तक भेट म्हणून दिले. त्यांच्यासोबत काम करताना मला खूप काही शिकायला मिळत आहे. आमची ही मालिका काहीच भागांचीच आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये काहीच भागांच्या मालिका प्रेक्षक आवडीने पाहातात. त्यामुळे आपल्याकडेदेखील ठरावीक भागांच्याच मालिका बनवल्या गेल्या पाहिजेत असे मला वाटते.