Join us  

नकळत सारे घडले’मध्ये नेहाच्या मातृत्वाची कसोटी!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 2:38 PM

नेहा आणि प्रतापमधल्या गैरसमजांचं मळभ दूर होत असतानाच आता नेहाला परीच्या नाराजीचा सामना करावा लागणार आहे.

स्टार प्रवाहवरील ‘नकळत सारे घडले’ या मालिकेत अत्यंत भावनिक वळण येणार आहे. नेहा आणि प्रतापमधल्या गैरसमजांचं मळभ दूर होत असतानाच आता नेहाला परीच्या नाराजीचा सामना करावा लागणार आहे. परी आणि नेहाईमधला मॅजिक बॉन्ड सर्वश्रूत आहेच. परीच्या जीवाला धोका असेल तर त्याची पहिली जाणीव नेहाला होते. माय-लेकीमधल्या या निरागस नात्याचा अनुभव प्रेक्षकांनी बऱ्याचदा मालिकेमधून घेतलाय. नेहा आणि परीमधल्या याच मॅजिक बॉंडवर आता प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. नेहाईचं आपल्यावर पूर्वीइतकं प्रेम राहिलेलं नाही असं परीला वाटतंय. त्याचमुळे आपला जीव धोक्यात घालून ती नेहाची परीक्षा घेण्याचं ठरवते. या परीक्षेत नेहा पास होणार का? परीचा जीव ती वाचवू शकणार का? माय-लेकीचं नात पुन्हा पूर्ववत होणार का? याची रंजक गोष्ट ‘नकळत सारे घडले’च्या पुढील भागांमध्ये उलगडणार आहे. 'नकळत सारे घडले' ही मालिका ​अभिनेता स्वप्निल जोशीची निर्मिती असलेली पहिली मालिका आहे. स्वप्निलने अर्जुन सिंह बरन आणि कार्तिक निशानदार यांच्या जीसीम्स या निर्मिती संस्थेत सहभागी होत या मालिकेची निर्मिती केली आहे.

टॅग्स :स्टार प्रवाह