Join us  

'आसूड' सिनेमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, या कलाकारांच्या मुख्य भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2019 2:23 PM

'आसुड' संघर्षकथेतून सकारात्मकता देणाऱ्या या चित्रपटाचे समीक्षकांनीही विशेष कौतुक केले आहे. एका वेगळ्या धाटणीची कथा, उत्तम पटकथेच्या माध्यमातून खुलवण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न यशस्वी झाला असून अनेक वर्षांनी मराठीत आलेला हा थरारक राजकीय पट प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरला आहे.

‘लोकांनी, लोकांकरिता लोकांद्वारे चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही’ ही लोकशाहीची व्याख्या सर्वमान्य आहे. परंतु सध्याच्या काळात लोकशाहीचे तथाकथित रक्षक असलेले हे राजकारणी मात्र लोकशाहीच्या खोट्या बुरख्याआडून ठोकशाही आणि हुकुमशाही करतानाच दिसतात. या सगळ्यात नाहक भरडला जातो तो सर्वसामान्य माणूस. हाच सर्वसामान्य माणूस जेव्हा एकजुटीने अन्याय आणि असंतोषाविरुद्ध पेटून उठतो तेव्हा प्रस्थापित राज्यव्यवस्था उलथून टाकण्याच सामर्थ्य त्याच्या ठाई असत. सामान्य जनतेने एकजुटीने उगारलेल्या वज्रमुठीची ताकद दाखवणारा ‘आसूड’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. गोविंद प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती डॉ. दीपक मोरे यांनी केली असून दिग्दर्शन निलेश रावसाहेब जळमकर यांचे आहे.

 

सत्ता आणि समाज यांच्यातला संघर्ष अधोरेखित करताना दिग्दर्शकाने शेतकऱ्यांच्या भीषण परिस्थितीकडेही या चित्रपटाच्या माध्यमातून लक्ष वेधले आहे. ‘स्वतःच्या हक्कांसाठी जेव्हा राजसत्तेविरोधात जनशक्तीचा उद्रेक होतो तेव्हा व्यवस्था आणि परिस्थिती दोहोंना बदलावे लागते. जनतेच्या मनात दडलेल्या असंतोषाचे आणि जनतेच्या एकीचे दर्शन घडवणाऱ्या ‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला आहे.

‘सामाजिक परिस्थितीत बदल घडवायचा असेल तर त्या बदलाची सुरुवात स्वतःपासूनच करायला हवी’ हा संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात ‘आसूड’ चित्रपट आणि दिग्दर्शक निलेश रावसाहेब जळमकर यशस्वी झाले आहेत. संघर्षकथेतून सकारात्मकता देणाऱ्या या चित्रपटाचे समीक्षकांनीही विशेष कौतुक केले आहे. एका वेगळ्या धाटणीची कथा, उत्तम पटकथेच्या माध्यमातून खुलवण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न यशस्वी झाला असून अनेक वर्षांनी मराठीत आलेला हा थरारक राजकीय पट प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरला आहे. मराठी चित्रपटाकडे आशय आहे पण मनोरंजन नाही असं म्हणत हिंदी सिनेमांकडे वळणाऱ्या प्रेक्षकवर्गाला ‘आसूड’च्या निमित्ताने मनोरंजनाचे दार उघडले आहे अशा भावना प्रेक्षकवर्गात आहेत.    

विक्रम गोखले, प्रदीप वेलणकर, माधव अभ्यंकर, अनंत जोग, दीपक शिर्के, उपेंद्र दाते, संदेश जाधव, कमलेश सावंत यांच्यासोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचा ठसा उमटवणारे राणा जंगबहादूर, अवतार गील हे नामवंत कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. त्यांच्यासोबतच अमित्रीयान पाटील आणि रश्मी राजपूत ही आघाडीची जोडी या चित्रपटात झळकणार आहेत. विशेष म्हणजे हिंदी सिनेसृष्टीतले सुप्रसिद्ध संगीतकार अनु मलिक यांनी ‘आसूड’ च्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी चित्रपटासाठी संगीत दिले आहे. कथेच्या अनुषंगाने येणाऱ्या तीन गीतांना सोनू निगम, आदर्श शिंदे, दिव्या कुमार आणि अनमोल मलिक यांनी स्वरबद्ध केले आहे.

या चित्रपटाची सहनिर्मिती विजय जाधव यांची आहे. तर सहदिग्दर्शन अमोल ताले यांचे आहे. कथा–पटकथा आणि संवाद निलेश रावसाहेब जळमकर व अमोल ताले यांचे आहेत. छायांकन अरुण प्रसाद यांनी केले असून संकलन सचिन कानाडे यांचे आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. 

टॅग्स :आसूड