Join us

महाराष्ट्राचा ‘सोंगाड्या’ : दादा कोंडकेंचा आज जन्मदिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2016 00:08 IST

मराठी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना तिकिट खिडकीवर गर्दी करण्यास भाग पाडणारे आणि मराठी जनसामान्यांच्या मनात आदराचे अढळ स्थान मिळवलेले महान ...

मराठी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना तिकिट खिडकीवर गर्दी करण्यास भाग पाडणारे आणि मराठी जनसामान्यांच्या मनात आदराचे अढळ स्थान मिळवलेले महान अभिनेते दादा कोंडके यांचा आज जन्मदिन. मुंबईतील नायगाव (दादर) येथे एका गिरणी कामगार कुटुंबात ८ आॅगस्ट १९३२ रोजी त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना अभिनयचे वेड जडलेले होते. घरची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे त्यांनी काही काळ किराणा दुकानातही नोकरी केली.पण म्हणतात ना, प्रतिभा जास्त काळ लपून राहत नाही. एक ना एक दिवस ती जगासमोर येतेच. फक्त गरज असते ती हेरण्याची. त्यासाठी निमित्त ठरले सुप्रसिद्ध मराठी नाटककार वसंत सबनीस. त्यांनीच दादांना अभिनयाची पहिली संधी दिली. नाटकांमध्ये त्यांचा प्रवेश झाल्यावर त्यांच्या ‘हटके’ अभिनयाचे वेड रंगभूमीला लागले.पुढे चालून मग त्यांनी स्वत:ची नाटक कंपनी सुरू केली. सबनीसांनी या कंपनीसाठी अनेक नाटकेसुद्धा लिहिली. त्यांच्या ‘विच्छा माझी पुरी करा’ या नाटकाने इतिहासच घडवला. प्रसिद्धीचे सर्व विक्रम मोडत या नाटकाचे दादांनी दीड हजारांपेक्षा जास्त प्रयोग केले.रंगभूमीवरील यशानंतर त्यांनी आपले लक्ष रुपेरी पडद्याकडे वळवले. ‘तांबडी माती’ हा त्यांचा पहिला चित्रपट. मात्र त्यांना घराघरात पोहचवले ते ‘सोंगाड्या’ या सिनेमाने. यानंतर तर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. ग्रामीण संस्कृतीचे खुसखुशीत संवादातून (अनेकदा द्विअर्थी) मांडलेले चित्रण त्यांच्या चित्रपटांत पहावयास मिळते. दादांनी मराठी प्रेक्षकांची नस अशी काही पकडली होती की, त्यांच्या नावानेच चित्रपटगृहांत ‘हाऊसफुल’चे फलक झळकत असत.लगातार नऊ चित्रपट ‘सिल्वर जुबली’ (२५ आठवडे) हीट देण्याचा विक्रम रचून दादांना ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये नाव नोंदवण्याचा बहुमान प्राप्त झाला. यावरून त्यांच्या अफाट लोकप्रियतेची कल्पना येईल. ‘एकटा जीव सदाशिव’, ‘पांडू हवालदार’, ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’, ‘आली अंगावर’, ‘आंधळा मारतो डोळा’ असे एकाहून एक विनोदी चित्रपटांचे नाव घेता येईल. केवळ मराठीच नाही तर ‘अंधेरी रात में, दिया तेरे हाथ में’, ‘तेरे मेरे बीच में’ अशा  हिंदी चित्रपटांचीसुद्धा त्यांनी निर्मिती केली.त्यांच्या चित्रपटांचे वैशिष्ट्य म्हणजे ओठांवर सहज चढणारी गाणी. अगदी साध्यासोप्या शब्दांत रचलेली आणि चटकन लक्षात राहिल अशा गोड चालीतील गाणी आजही रसिकांना आकर्षित करतात. ‘वर ढगाला लागली कळ’, ‘चंदनाच्या पाटावर’, ‘झाल्या तिन्ही सांझा’, ‘गालावरची खळी’, ‘अंजनीच्या सुता’, ‘हिल पोरी हिला’, ‘बाई मी केळीवाली मी’, ‘माणसा परास मेंढरं परी’ अशी अवीट आणि अविस्मरणीय गाण्यांची भेट त्यांनी आपल्याला दिली.दुर्दैवी घटनेत आपले जवळच्या कुटुंबियांना गमावल्यानंतर दु:खातून सावरताना दादांच्या स्वभावात फार बदल झाला. आयुष्याची दुखरी बाजू दाखविण्याऐवजी त्यांनी चित्रपटांच्या माध्यमातून लोकांना हसविण्यावर लक्ष केंद्रित केले. साधा-सरळ, पापभिरू, निरागस, प्रसंगी बालिश स्वभावाच्या व्यक्तीरेखा त्यांनी निभावल्या. दैनंदिन जीवनातील घटनातून विनोद निर्मिती करण्यात तर त्यांचा हात कोणीच धरू शकत नाही. आजही गावोगावीच्या जत्रा, उरुस आणि टूरिंग टॉकिजमधून त्यांचे चित्रपट आवडीने पाहिले जातात.cnxoldfiles/strong>ची आदरांजली.