Join us  

'खारी बिस्कीट' या चित्रपटाचे पहिले गाणे तुम्ही ऐकले का?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 9:00 PM

'खारी बिस्कीट'चे पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीस आले असून या गाण्यात या भावंडांचे प्रेम आपल्याला पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देनुकत्याच रिलीज झालेल्या या गाण्याचे शब्द क्षितिज पटवर्धनचे असून या गाण्याचे संगीतकार सुरज-धीरज ही जोडगोळी असून कुणाल गांजावालाने गायलेले हे गाणं झी म्युझिकच्या द्वारे श्रोत्यांच्या भेटीस आलं आहे.

झी स्टुडिओने गेल्या काही वर्षांत सैराट, फँड्री, नाळ, टाइमपास, ती सध्या काय करते यांसारखे एकाहून एक हिट चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. आता त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा लवकरच होणार असून या चित्रपटात काही चिमुरड्यांची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

 'खारी बिस्कीट' या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून 'खारी बिस्कीट' म्हणजे नेमके काय? हा प्रश्न कित्येकांना पडला होता. तर ही आहे चिमुरड्या भावंडांची जोडगोळी. खारीसाठी बिस्कीट आणि बिस्किटसाठी खारी म्हणजे जीव की प्राण. अवघ्या पाच वर्षांच्या गोंडस खारीची इच्छा म्हणजे आठ वर्षांच्या बिनधास्त बिस्किटसाठी राजकुमारीचा हुकूम. खारी हे जग तिच्या डोळ्यांनी पाहू शकत नसली तरी ती स्वप्नं बेमालूमपणे पाहते. ही गोष्ट आहे या दोघांची. पदरी गरिबी असली तरी तिच्या डोळ्यांत कधीही पाणी आणू न देण्यासाठी, तिचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत झटणाऱ्या आणि तिला फुलासारखं जपणाऱ्या बिस्किटची आणि त्याच्यावर निरपेक्ष प्रेम करणाऱ्या खारीची. 

'खारी बिस्कीट'चे पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीस आले असून या गाण्यात या भावंडांचे प्रेम आपल्याला पाहायला मिळत आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या या गाण्याचे शब्द क्षितिज पटवर्धनचे असून या गाण्याचे संगीतकार सुरज-धीरज ही जोडगोळी असून कुणाल गांजावालाने गायलेले हे गाणं झी म्युझिकच्या द्वारे श्रोत्यांच्या भेटीस आलं आहे.

झी स्टुडिओज आणि ड्रीमिंग ट्वेन्टी फॉर सेव्हन यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून येत्या २७ सप्टेंबरला 'खारी बिस्कीट'  हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. संजय जाधव दिग्दर्शित 'खारी बिस्कीट' या चित्रपटाची पत्रकार परिषद मुंबईमध्ये नुकतीच आयोजित करण्यात आली होती. यावेळी चित्रपटातील कलाकारांची ओळख करून देण्यात आली. बिस्किटची भूमिका आदर्श कदमने साकारली आहे तर खारी साकारलीय वेदश्री खाडिलकर हिने... याशिवाय सोहम जाधव, स्वानंद शेळके, शर्व दाते यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडेल अशी या चित्रपटाच्या टीमला खात्री आहे.