Join us  

वैयक्तिक कारणामुळे या अभिनेत्याला बंद करावा लागतोय हॉटेल व्यवसाय, सविस्तर वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 12:37 PM

मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून या अभिनेत्याने रसिकांच्या मनात घर केले आहे.

विविध मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून आपली आगळीवेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता शशांक केतकर सध्या ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेत सिद्धार्थची भूमिका साकारताना दिसतो आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. 

शशांक सोशल मीडियावर सक्रीय असून त्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमधून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

त्याने या पोस्टमध्ये लिहिलंय की, शाळा-कॉलेजमध्ये असताना एक स्वप्न पाहिलं होतं की आपलं स्वतःचं हॉटेल असलं पाहिजे आणि ते स्वप्न पूर्ण ही झालं! पुण्यात 'आईच्या गावात' या नावाने हॉटेल सुरूही केलं आणि गेली तीन साडेतीन वर्ष आई-बाबा, दीक्षा, प्रियांका आणि हॉटेलचा सगळा स्टाफ यांच्या सपोर्ट नी ते उत्तम चालू ही ठेवलं. पण काही वैयक्तिक कारणांमुळे आता आम्हाला हा व्यवसाय बंद करावा लागतोय.

पुढे शशांकने म्हटलंय की, आत्ताच्या जागेवर संपूर्ण सेटप सहित जर कोणाला हॉटेल चालवायचे असल्यास मला संपर्क साधावा किंवा हॉटेल चे सामान विकत घ्यायचे असल्यासही मला संपर्क साधावा. सर्वांना एक विनंती मी कामात व्यस्त असल्यामुळे पुढील details साठी माझ्या वडिलांना शिरीष केतकर यांना संपर्क साधावा.

 शशांकने ११ ऑक्टोबर, २०१६ रोजी पुण्यात  'आईच्या गावात' हे स्वतःचं हॉटेल सुरू केलं होतं. या हॉटेलच्या उद्घाटनाला अभिनेत्री अमृता खानविलकर आली होती. या हॉटेलला चांगला प्रतिसाददेखील मिळत होता.

मात्र आता त्याला कदाचित बिझी शेड्युलमुळे किंवा इतर काही कारणामुळे हा व्यवसाय बंद करावा लागतो आहे. 

टॅग्स :शशांक केतकर