Join us  

'मलायकापासून विभक्त होणं गरजेचं होतं, कारण..'; अरबाज खानने केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2021 2:15 PM

Arbaaz khan: १९९८ मध्ये मलायका आणि अरबाज या दोघांनी लग्नगाठ बांधली होती. मात्र, काही कारणास्तव या दोघांनी त्यांचा इतक्या वर्षांचा संसार मोडला आणि २०१७ मध्ये विभक्त झाले.

एकेकाळी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी म्हणून मलायका अरोरा आणि अरबाज खान यांच्याकडे पाहिलं जायचं. १९९८ मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली होती. मात्र, काही कारणास्तव या दोघांनी त्यांचा इतक्या वर्षांचा संसार मोडला आणि २०१७ मध्ये विभक्त झाले. मलायका- अरबाजच्या घटस्फोटानंतर बराच काळ चाहत्यांमध्ये त्यांची चर्चा होती. कारण, घटस्फोट घेण्यापूर्वी त्यांच्या नात्यातील कुरबूर सोशल मीडियावर कधीच चर्चिली गेली नव्हती. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटामुळे अनेकांना धक्का बसला होता. घटस्फोटानंतर या दोघांनीही अनेकदा मुलाखतींमध्ये त्यांच्या या निर्णयावर भाष्य केल्याचं पाहायला मिळालं. परंतु, अलिकडेच झालेल्या एका मुलाखतीत अरबाजने या घटस्फोटामागील मूळ कारण सांगितलं आहे. 

घटस्फोटानंतर आजही अरबाज आणि मलायका एकमेकांचे चांगले मित्र आहेत. परंतु, या घटस्फोटामागील मूळ कारण त्याने पिंकविलाच्या मुलाखतीत स्पष्ट केलं आहे.

"माझा मुलगा अरहानसाठी हा निर्णय फार कठीण होता. कठीण काळात त्या समस्येची तीव्रता वाढवण्यापेक्षा मलायकापासून विभक्त होणं माझ्यासाठी जास्त गरजेचं होतं. माझ्या मुलासाठी मी कायम खंबीरपणे उभा आहे. मलायकाकडे माझ्या मुलाची कस्टडी आहे. आणि, मी सुद्धा कधीच त्याच्या कस्टडीसाठी वाद घातला नाही. मुलांचं संगोपन एक आईच उत्तमरित्या करु शकते. आणि, मला माझ्या मुलाच्या समजूतदारपणावर कोणतीच शंका नाही", असं अरबाज म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "आमचा घटस्फोट झाला त्यावेळी अरहान १२ वर्षांचा होता. हे सगळं काय घडतंय याची त्याला पूर्ण कल्पना होती. त्यामुळे तो गोंधळून जाईल असं काहीच नव्हतं. असं म्हणतात ना, लहान मुलांना सगळ्या गोष्टींची कल्पना आधीच येते. तसंच काहीसं आहे समजा."

दरम्यान, मलायका आणि अरबाज यांचा घटस्फोट होऊन आता ५ वर्ष झाली आहेत. दोघंही आपआपल्या मार्गाने पुढे गेले असून मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. तर अरबाज, जॉर्जियाला डेट करत असल्याचं म्हटलं जातं. 

टॅग्स :अरबाज खानबॉलिवूडसेलिब्रिटीमलायका अरोरा