अभिनेते विजय चव्हाण हे गेल्या काही दिवसांपासून खूप आजारी होते. पण आता ते आजारपणातून पूर्णपणे बरे झाले असून, उठायला-बसायलाही लागले आहेत. पण तरी आजही काही सोशल नेटवर्किंग साईट्सवर त्यांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचे संदेश फिरत आहेत. याबाबत विजय चव्हाण यांनी मी पूर्णपणे बरा असून, लवकरात लवकर चित्रपटांच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे, असा संदेश त्यांच्या चाहत्यांना दिला आहे. विजय चव्हाण यांनी याबाबत ‘सीएनएक्स’शी मारलेल्या खास गप्पा...प्रश्न : तुमच्या तब्येतीच्या बाबतीत खूप अफवा आहेत. काय सांगाल?माझी तब्येत पूर्णपणे ढासळली आहे. मी अंथरुणावरून हलूही शकत नाही अशा प्रकारचे संदेश आणि फोटो सोशल मीडियावरून सध्या फिरत आहेत. या सगळ्या गोष्टी पूर्णपणे चुकीच्या असल्याचे मला माझ्या चाहत्यांना सांगायचे आहे. माझी तब्येत बिघडली होती हे खरे असले तरी मी आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे. प्रश्न : तुमच्या तब्येतीला नेमके काय झाले होते?मी काही महिन्यांपासून सतत चित्रीकरण करत होतो. आजारी पडायच्या आधी कोल्हापूरला जवळजवळ १५ दिवस ‘काव काव कावळे’ आणि ‘अतिथी देवो भव’ या दोन चित्रपटांचे चित्रीकरण करत होते. या चित्रीकरणाच्या वेळीच माझे पाय प्रचंड सुजायला लागले होते. तुम्हाला विश्वास बसणार नाही; पण मला पायात चप्पलही घालता येत नव्हती. पण मी मुंबईला परतलो असतो तर निर्मात्यांचे प्रचंड नुकसान झाले असते. त्यामुळे त्या अवस्थेतही मी चित्रीकरण करतच राहिलो. माझ्या तब्येतीच्या बाबतीत घरातल्यांनाही काही कळवले नाही. दरम्यान युनिटमधील लोकांनी तेथील एका डॉक्टरलाही बोलावले होते. पण त्यांनी दिलेल्या औषधाचा माझ्यावर काहीही परिणाम झाला नाही. उलट सूज दिवसेंदिवस वाढतच होती. चित्रीकरण संपल्यावर मुंबईत आल्यावर थेट मी मुलुंडमधील धन्वंतरी या हॉस्पिटलमध्ये गेलो. त्या वेळी माझे वजनही चांगलेच वाढले होते. माझ्या पायाची सूज पाहून डॉक्टर माझ्यावर प्रचंड चिडले. त्यांनी मला लगेचच अॅडमिट करून घेतले. माझ्या पायात खूप पाणी झाल्याचे त्यांनी मला सांगितले. त्यावर मला दुष्काळी भागात ठेवा, लोकांची पाण्याची सोय होईल असे म्हणून मी डॉक्टरांची टरही खेचली होती. माझी फुप्फुसं कमकुवत असल्याने पाय सुजत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उपचार सुरू करूनही माझी तब्येत अधिकच बिघडत होती. त्यामुळे मला मुलुंडमधीलच फोर्टिसमध्ये शिफ्ट करण्यात आले. तिथे जवळजवळ मी एक महिना आयसीयूत होतो. मृत्यूच्या दाढेतून मी परत आलो आहे असेच मी म्हणेन.प्रश्न : तुम्हाला हा त्रास पूर्वीपासूनच होत होता का? पाय सुजण्याचा त्रास २०१२पासूनच सुरू झाला होता. मी त्या वेळी ‘श्रीमंत दामोदर पंत’ या चित्रपटाचे चित्रीकरण करत होतो. मुंबईचे चित्रीकरण झाल्यानंतर आम्हाला कोल्हापूरला जायचे होते. पण माझे पाय खूपच सुजत असल्याने मी डॉक्टरांना दाखवले. त्या वेळीच माझी फुप्फुसं कमकुवत झाली असल्याचे मला डॉक्टरांनी सांगितले होते. पुढील आयुष्यात मला रोज दिवसातील काही तास तरी आॅक्सिजन सिलिंडरची गरज लागणार असे त्यांनी सांगितले होते. कोल्हापूरला ‘श्रीमंत दामोदरपंत’चे चित्रीकरण सुरू होऊन पाच दिवस झाले होते. पण तरीही मी मुंबईत अॅडमिटच होतो. शेवटी मी अॅम्ब्युलन्स घेऊन कोल्हापूरला गेलो होतो. त्या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी ‘माझी वॅनिटी तुझ्यापेक्षा किती सुसज्ज आहे हे बघ,’ अशी मी भरतची अनेकवेळा मस्करी करायचो. मी कोल्हापूरला माझ्यासोबत आॅक्सिजन सिलिंडरही घेऊन गेलो होतो. मी ते सिलिंडर सेटवरच ठेवायचो. चित्रीकरणाच्या वेळी एक दृश्य झाले की, मी लगेचच आॅक्सिजन लावत असे. त्यानंतर काही दिवसांनी माझी तब्येत काहीशी सुधारली. पण तरीही रोज रात्री आॅक्सिजन थोडा वेळ तरी मला लावावा लागत असे. त्यामुळे तेव्हापासून मी कोणत्याही चित्रपटाच्या चित्रीकरणाला जाताना सिलिंडर माझ्या सोबत घेऊन जात असे. या दरम्यानच्या काळातही मी घरी बसून राहिलो नाही. मी या तीन-चार वर्षांच्या काळात ‘हलाल’, ‘काव काव कावळे’, ‘अतिथी देवो भव’, ‘हुंताश’, ‘सांगतो ऐका’, ‘ए ढिश्शूम’ यांसारख्या चित्रपटांचे चित्रीकरण केले.प्रश्न : या आजारपणात मराठी फिल्म इंडस्ट्री तुमच्या पाठीशी उभी राहिली?मी आजारी आहे हे कळल्यावर इंडस्ट्रीतील लोकांची हॉस्पिटलमध्ये अक्षरश: रीघ लागलेली होती. मी आयसीयूत असल्याने मला भेटायची कोणालाच परवानगी नव्हती. पण सगळे माझ्या कुटुंबीयांना येऊन भेटत होते. दिवसभरात तर लोक यायचे पण काही जण रात्री चित्रीकरण संपल्यावर दीड-दोनला हॉस्पिटलला येऊन जायचे. मी ज्यांच्यासोबत काम केले, ते सगळे तर आले; पण ज्यांच्यासोबत मी कधी काम केले नाही असेही लोक मला आवर्जून भेटायला आले. मला भेटायला येणाऱ्यांची संख्या इतकी होती की, इतरांना त्रास होऊ नये म्हणून फोर्टिस हॉस्पिटलने मला भेटायला येणाऱ्या लोकांसाठी एक वेगळी खोलीच दिली होती.प्रश्न : आता तुमची तब्येत कशी आहे आणि तुम्ही पुन्हा चित्रीकरणाला कधी सुुरुवात करणार आहात?मी आता व्यवस्थित उठायला-बसायला लागलो आहे. आता मला जेवणही जात आहे. त्यामुळे काहीच महिन्यांत माझी तब्येत पूर्णपणे बरी होईल अशी मला खात्री आहे. तब्येत बरी झाल्यावर लगेचच मी चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. लवकरात लवकर तितक्याच जोमाने मी पुन्हा काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.
- prajakta.chitnis@lokmat.com