Join us  

"मला भेटायचं असेल तर ५ लाख द्या.."; अनुराग कश्यप असं का म्हणाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 3:41 PM

अनुरागने स्वतःची किंमत ठरवली आहे. पंधरा मिनिटं, अर्धा तास किंवा एक तास अनुरागला भेटायचं असेल तर किती पैसे मोजावे लागतील? आताच जाणून घ्या

'गँग्ज ऑफ वासेपूर',  'मनमर्जिया', 'अग्ली', 'ब्लॅक फ्रायडे' असे सिनेमे दिग्दर्शित करुन संपूर्ण बॉलिवूडलाच नाही तर भारताला दखल घ्यायला लावणारा अनुराग कश्यप. अनुरागचे सिनेमे वेगळ्याच पठडीचे असतात. अनुराग सोशल मीडियावर विविध पोस्टच्या माध्यमातून त्याची मतं परखडपणे व्यक्त करत असतो. अशातच अनुरागने नुकतंच सोशल मीडियावर त्याला भेटायचं असेल तर ५ लाख रुपये मोजा, असं सांगितलं आहे. नेमकं काय घडलं असं?

अनुराग कश्यपने सोशल मीडियावर लिहीलंय की, "जर कोणी मला 10-15 मिनिटांसाठी भेटू इच्छित असेल तर मी 1 लाख, अर्ध्या तासासाठी 2 लाख आणि 1 तासासाठी 5 लाख फी आकारेन. मी लोकांना भेटण्यात वेळ वाया घालवून थकलो आहे. तुम्हाला ते परवडेल असं वाटत असेल तर मला कॉल करा नाहीतर दूर राहा. आणि तुम्ही अॅडव्हान्स रक्कम भरली तरच आपली भेट होईल."

ही पोस्ट शेअर करताना अनुरागने कॅप्शनमध्ये लिहिले की, "मला म्हणायचे आहे की मला मेसेज किंवा DM किंवा कॉल करू नका. आधी पेमेंट करा आणि मग मी तुम्हाला वेळ देईल. मी धर्मादाय संस्था नाही. आयुष्यात शॉर्टकट शोधणाऱ्या लोकांना मी कंटाळलो आहे." अशाप्रकारे अनुरागने लोकांना भेटण्यासाठी स्वतःची किंमत ठरवली  आहे. अनेकांनी अनुरागच्या पोस्टवर विविध कमेंट केल्या आहेत.

टॅग्स :अनुराग कश्यपबॉलिवूड