Join us  

Sanjay Dutt Birthday Special : या कारणामुळे संजय दत्त गेला होता ऋषी कपूरला मारायला...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 12:05 PM

संजय दत्त गुलशन ग्रोव्हरला घेऊन ऋषी कपूरला मारण्यासाठी त्याच्या घरी गेला होता. हा किस्सा गुलशननेच एका मुलाखतीत सांगितला होता.

ठळक मुद्देसंजू आणि टीना मुनिम दोघे त्यावेळी नात्यात होते आणि त्यांच्या ब्रेकअपनंतर चिंटू (ऋषी कपूर) आणि टीनाचे अफेअर सुरू असल्याची संजयला शंका आली होती. त्यामुळे आम्ही चिंटूच्या घरी जाऊन त्याला मारायचे ठरवले होते.

संजय दत्तचा आज वाढदिवस असून सुनील दत्त आणि नर्गिस या बॉलिवूडमधील आघाडीच्या कलाकारांच्या घरी त्याचा जन्म झाला. आई-वडील दोघेही अतिशय प्रसिद्ध असल्याने संजयला बॉलिवूडमध्ये एंट्री करणे अतिशय सोपे गेले. रॉकी या चित्रपटाद्वारे सुनील दत्त यांनी त्याला लाँच केले. पण या चित्रपटाच्या चित्रीकरणापूर्वी त्याच्या ड्रग्सच्या व्यसनाची चांगलीच चर्चा झाली होती. याच चित्रपटाच्या सेटवर संजय आणि टीना मुनिम यांच्यातील अफेअरला सुरुवात झाली.

रॉकी या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्याआधीच टीना आणि संजय यांची चांगलीच मैत्री होती. रॉकी या चित्रपटानंतर ते जवळजवळ दोन वर्षं नात्यात होते. पण संजय दारू, ड्रग्सच्या अधीन गेला असल्याने टीनाने त्याच्यासोबत ब्रेकअप केले. त्यांच्या ब्रेकअपनंतर टीना ऋषी कपूरसोबत एका चित्रपटाचे चित्रीकरण करत होती. याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ऋषी आणि टीना एकमेकांच्या प्रेमात पडले असल्याच्या चर्चांना ऊत आले होते. 

या सगळ्या चर्चा ऐकून संजय प्रचंड चिडला होता आणि त्याने ऋषी कपूरला त्याच्या घरी जाऊन मारायचे असे ठरवले. ऋषीच्या घरी जाताना तो त्याचा अतिशय जवळचा मित्र गुलशन ग्रोव्हरला देखील सोबत घेऊन गेला होता. पण नीतू कपूर यांनी मध्यस्ती करत संजय दत्तचा राग शांत केला. या किस्स्याविषयी गुलशन ग्रोव्हरनेच एका मुलाखतीत सांगितले होते. 

त्याने म्हटले होते की, संजू आणि टीना मुनिम दोघे त्यावेळी नात्यात होते आणि त्यांच्या ब्रेकअपनंतर चिंटू (ऋषी कपूर) आणि टीनाचे अफेअर सुरू असल्याची संजयला शंका आली होती. मी आणि संजू एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स असल्याने त्याने मला याविषयी सांगितले. त्यामुळे आम्ही चिंटूच्या घरी जाऊन त्याला मारायचे ठरवले होते. पण आम्ही घरी पोहोचलो, त्यावेळी तिथे नितू होती. तिने संजूला समजावले की, ऋषी आणि टीना यांच्यात अफेअर नाहीये. या सगळ्या केवळ अफवा आहेत. त्यामुळेच मी आणि संजू ऋषीच्या घरातून निघून गेलो.

ही घटना घडल्यानंतर काहीच महिन्यात ऋषी आणि नितू यांचे लग्न झाले होते.  

टॅग्स :संजय दत्तऋषी कपूरटीना मुनिमगुलशन ग्रोव्हर