Join us  

माधुरी नाही ‘एना’मुळे मोडले होते संजय दत्तचे पहिले लग्न, 27 वर्षांपूर्वी खुद्द बाबाने केला होता खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 8:00 AM

आज संजूबाबाचा वाढदिवस...

ठळक मुद्दे 1993 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत संजयने रिचा व त्याचे लग्न मोडण्यामागे रिचाच्या कुटुंबाला जबाबदार ठरवले होते.

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याचा आज वाढदिवस आहे.  खलनायक  ते मुन्ना भाई एमबीबीएस पर्यंत अनेक हिट सिनेमे देणाºया संजूबाबाचे खरे आयुष्यही  एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. 29जुलै 1959 रोजी सुनील दत्त आणि नर्गिसच्या घरात जन्मलेल्या संजय दत्तने बॉलिवूडचे बरोबरच स्वत:चेही नाव कमविले, मात्र त्यांच्या आयुष्यात घडलेले वाददेखील विसरण्यासारखे नाहीत.       तर आज सांगणार आहोत संजूबाबाच्या पहिल्या पत्नीविषयी.  संजू बाबाने तीन लग्न केलीत. त्याची पहिली पत्नी रिचा शर्मा हिचे ब्रेन ट्यूमरच्या कारणाने निधन झाले. त्यानंतर त्याने रिया पिल्लई हिच्याशी लग्न केले आणि  शेवटी मान्यता त्याच्या आयुष्यात आली.  

1987 साली संजयने रिचा शर्मासोबत पहिले लग्न केले होते. रिचाने संजयसाठी स्वत:चे फिल्मी करिअर सोडले. मात्र रिचाला ब्रेन ट्युमर झाला आणि या लव्हस्टोरीला ब्रेक लागला, असे म्हणतात. ब्रेन ट्युमर झाल्यानंतर रिचा 3 वर्षे उपचारासाठी अमेरिकेत होती. उपचारानंतर ती भारतात परतली तेव्हा बाबा व माधुरी दीक्षितच्या अफेअरच्या बातम्या तिच्या कानावर आल्या आणि रिचा कोलमडली. पण त्याहीस्थितीत ती बाबाला सोडायला तयार नव्हती.

एका मुलाखतीत ती यावर बोलली होती. ‘संजयने माझ्या आयुष्यात परत यावे असे मला वाटते. आम्ही दीर्घकाळापासून वेगळे राहतोय. तुला घटस्फोट हवा का? असे संजयला मी विचारले होते. पण त्याने नकार दिला होता. मलाही घटस्फोट नकोय. फक्त तो मला परत हवाय. काहीही झाले तरी मी त्याच्यावर खूप प्रेम करते. मी नेहमी त्याच्यासोबत राहू इच्छिते,’ असे रिचा म्हणाली होती.

रिचा तिचा संसार वाचवण्यासाठी धडपडत होती. याचदरम्यान तिच्या आजाराने पुन्हा डोके वर काढले आणि रिचाला पुन्हा उपचारासाठी अमेरिकेत जावे लागले. मात्र तोपर्यंत रिचा व संजय दोघांमधील दरी इतकी वाढली होती की, अखेर दोघांचा घटस्फोट झाला. पण या घटस्फोटाचे कारण माधुरी दीक्षित नव्हती तर संजयची साळी एना होती.

हो, संजयने अनेक वर्षांनी याचा खुलासा केला होता. 1993 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत संजयने रिचा व त्याचे लग्न मोडण्यामागे रिचाच्या कुटुंबाला जबाबदार ठरवले होते. तो म्हणाला होता, ‘रिचाच्या आजारामुळे आमचे लग्न मोडले, हे खोटे आहे. कॅन्सरमुळे बायकोचे केस गळताहेत म्हणून तिला सोडून देणारा नवरा मी नाही. रिचाचे व माझे नाते संपुष्टात आले आहे. मला तिच्याबद्दल काहीही तक्रार नाही. पण हो, आमचे नाते तुटले यासाठी तिचे कुटुंब जबाबदार होते. तिच्या कुटुंबाची आमच्या संसारात नको इतकी लुडबूड होती. ते सतत माझ्यावर काही ना काही आरोप करते. रिचाची बहीण एना आमचे लग्न मोडण्यात आघाडीवर होती. ती आमच्यात गैरसमज निर्माण करायची. संसार आमचा होता. ती त्यात दखल देणारी कोण होती? ’ 

टॅग्स :संजय दत्त