Join us  

या कारणामुळे आमिर खान आणि जुही चावला यांच्यामध्ये होता अबोला, आमिरने केले होते हे चुकीचे काम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 3:13 PM

आमिर खानने केलेल्या एका गोष्टीमुळे जुही त्याच्याशी सात वर्षं बोलत नव्हती. त्यानेच ही गोष्ट एका मुलाखतीत सांगितली होती.

ठळक मुद्देएकदा आमिरने मला भविष्य कळते, असे म्हणून जुहीला हात पुढे करायला सांगितले. पण जुहीने जसा हात पुढे केला तसा आमिर तिच्या हातावर थुंकला. या प्रकारानंतर जुही इतकी खवळली की, तिने आमिरशी बोलणे बंद केले.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने त्याच्या करियरमध्ये अनेक टॉपच्या अभिनेत्रींसोबत काम केले आहे. पण त्याची जोडी त्याच्या फॅन्सना ही सगळ्यात जास्त जुही चावलासोबतच आवडते. त्या दोघांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ‘कयामत से कयामत तक’ पासून ‘इश्क’पर्यंत या जोडीने लोकांना वेड लावले. ‘इश्क’नंतर मात्र ही जोडी कधीच एकत्र दिसली नाही. याचे कारण म्हणजे, दोघांमध्ये निर्माण झालेले मतभेद. जुही आणि आमिर हे दोघे एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. पण एक वेळ अशी आली की, त्या दोघांनीही एकमेकांशी सहा-सात वर्षे अबोला धरला. याविषयी आमिरनेच एका मुलाखतीत सांगितले होते.

‘इश्क’ या चित्रपटाच्या सेटवरचा हा किस्सा. या सेटवर आमिर अनेकदा जुहीची मजा घेत, तिच्यासोबत प्रँक करायचा. आमिरला ही सवयचं होती. आपल्या सहकलाकारांची फजिती करताना त्याला मज्जा यायची. एकदा त्याने मला भविष्य कळते, असे म्हणून जुहीला हात पुढे करायला सांगितले. पण जुहीने जसा हात पुढे केला तसा आमिर तिच्या हातावर थुंकला. या प्रकारानंतर जुही इतकी खवळली की, तिने आमिरशी बोलणे बंद केले. अर्थात दोघांनीही ‘इश्क’च्या शूटींगवर या वादाचा परिणाम होऊ दिला नाही.

आमिरने याविषयी एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘इश्क’च्या सेटवर माझ्यात, जुहीत क्षुल्लक वाद झाला होता. यानंतर मी तिच्याशी कधीच न बोलण्याचा निर्णय घेतला. मी तेव्हा असे का वागलो, ते मला आजही कळत नाही. या भांडणातच आम्ही ‘इश्क’चे शूटींग पूर्ण केले. पुढे सहा-सात वर्षे आमचा अबोला होता. यानंतर सात वर्षांनंतर अचानक एकेदिवशी मला जुहीचा फोन आला. मी तिचा फोन घेणार नाही, हे तिला ठाऊक होते. पण तरीही तिने मला फोन केला. मी फोन घेतला. यानंतर मला तुला भेटायचंय, असे जुही मला म्हणाली. मी आणि रिना घटस्फोट घेतोय, हे जुहीला कळले होते. यासंदर्भात तिला मला भेटायचे होते. ती मला भेटली. तिने मला खूप समजावले. आमचा संसार वाचवण्यासाठी तिने अनेक प्रयत्न केलेत. आज माझ्यात आणि जुहीत अबोला नाहीये. आमची मैत्री आजही कायम आहे, असे आमिरने सांगितले.

टॅग्स :आमिर खानजुही चावला