दिव्या भारतीने बोबिली राजा या दाक्षिणात्य चित्रपटाद्वारे तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तिच्या अभिनयाची आणि सौंदर्याची त्याकाळात चांगलीच चर्चा झाली होती. दिव्याने विश्वात्मा या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री केली. पहिल्याच चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. त्यानंतर तिने दिल का क्या कसूर, शोला शबनम, दिवाना, दिल आशना है, रंग यांसारखे अनेक हिट चित्रपट दिले. दिव्याला तिच्या अभिनयासाठी अनेक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. ५ एप्रिल १९९३ला घरातील बाल्कनीमधून पडून दिव्याचा मृत्यू झाला होता. आज दिव्याला जाऊन अनेक वर्षं झाले असले तरी तिच्या चित्रपटाचे, तिच्या अभिनयाचे अनेक चाहते आहेत.
दिव्या भारती आणि आमिर खान एका शो साठी लंडनला गेले असता त्यांच्यात भांडणं झाली होती अशी बातमी त्या काळी वर्तमानपत्रात आली होती. दिव्यानेच एका मुलाखतीत याविषयी सांगितले होते. ती म्हणाली होती की, लंडनमध्ये झालेल्या एका शो मध्ये माझ्याकडून एक छोटीशी चूक झाली होती. पण तिच्या माझ्या लगेचच लक्षात आल्याने मी ती सुधारली देखील होती. पण आमिरच्या ही गोष्ट लक्षात आल्याने त्याने माझ्यासोबत परफॉर्म करायला नकार दिला होता आणि त्याने माझ्याऐवजी जुही चावलासोबत परफॉर्म केले होते. तसेच त्याने मी खूप थकलोय हे कारण देत माझ्यासोबत मेडली करण्यास देखील नकार दिला होता. त्यामुळे मी खूपच उदास झाली होती आणि बाथरूममध्ये जाऊन मी कित्येक तास रडली होती. पण मी शो साठी पैसे घेतल्याने माझ्याकडे परफॉर्म करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यावेळी सलमान खान माझ्या मदतीला धावून आला होता आणि त्याने तिच्यासोबत मेडली परफॉर्म केले होते.
एवढेच नव्हे तर शाहरुख खान आणि सनी देओलच्या डर या चित्रपटात जुही चावला नव्हे तर दिव्या भारती मुख्य भूमिकेत होती. पण आमिर खानमुळेच या चित्रपटातून तिचा पत्ता कापण्यात आला होता असे तिच्या आईने एका मुलाखतीत सांगितले होते.