Join us  

अरेच्चा..! भूतानमध्ये असं काय घडलं की, अनुष्का शर्माला अर्ध्या रस्त्यात सोडून पळाला होता विराट कोहली 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 2:21 PM

विराटने भूतान ट्रीपमधील एक मजेशीर किस्सा नुकताच शेअर केला आहे. त्याचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होतो आहे.

कोरोना व्हायरसमुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे सर्व कलाकार घरात कैद आहेत. मात्र ते सोशल मीडियावर सक्रीय आहेत आणि त्यांच्या पोस्टमुळे चर्चेतही येत आहेत. तसेच सेलिब्रेटी कपल अनुष्का शर्माविराट कोहलीदेखील कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत येत आहेत. लॉकडाऊनच्या काळात विराट अनुष्काबद्दल अनेक किस्से चाहत्यांशी शेअर केले आहेत ज्यामुळे तो सतत चर्चेत येत असतो. आताही त्याने अनुष्का आणि त्याच्या मागील वर्षातील भूतान ट्रीपमधील एक मजेशीर किस्सा शेअर केला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विराट कोहलीने नुकतेच फुटबॉलपटू सुनील छेत्रीसोबत एका लाइव्ह सेशनमध्ये भाग घेतला होता. यावेळी त्याने अनुष्काशी संबंधीत हा किस्सा शेअर केला. तो म्हणाला की, हे सर्व जेव्हा घडले तेव्हा अनुष्काने त्याच्याशी बोलणेच बंद केले होते. या लाइव्ह चॅटमध्ये सुनील छेत्रीने विराटला विचारले, तुमच्या भूटान ट्रीपच्या वेळी असे काय झाले होते ज्यामुळे तू अनुष्काला अर्ध्या रस्त्यातच सोडून पळून गेला होतास.

सुनील छेत्रीच्या या प्रश्नाचे उत्तर देताना विराट म्हणाला, आम्ही भूतानला गेलो होतो. आम्ही दोघेही बाइकवर निघालो होतो. दोघेही एकत्रच बाइक चालवत होतो आणि त्यावेळी तिथे भारतीय पर्यटक सुद्धा आले होते. मी मध्येच एका ठिकाणी गर्दी पाहिली. त्यांच्यातला एक म्हणत होता हा तर विराटसारखा दिसतो. मी ते ऐकले आणि माहित नाही माझ्या डोक्यात काय आले मी बाइकचा स्पीड वाढवला आणि पुढे निघून गेलो आणि अनुष्का मागेच राहिली. नंतर जेव्हा मी तिच्याकडे गेलो तर ती माझ्याकडे बघत सुद्धा नव्हती ना नीट बोलत होती.

विराट कोहलीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. विराट-अनुष्काच्या एका फॅनपेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सध्या विराट आणि अनुष्का त्यांच्या मुंबईच्या घरी क्वारंटाइन आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी या दोघांचा क्रिकेट खेळतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. 

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्मा