Join us  

इंडस्ट्रीतल्या मित्रांनीच पाठीत सुरा खुपसला...! श्रेयस तळपदेचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 4:34 PM

Shreyas Talpade : आपल्या करिअरमध्ये श्रेयसने अनेक सिनेमे केलेत. पण त्याला म्हणावे तसे यश मिळाले नाही. कारण काय? 

ठळक मुद्दे‘इक्बाल’ हा श्रेयसचा गाजलेला सिनेमा. मात्र या सिनेमासाठी त्याला स्वत:चे लग्न लपवावे लागले होते.

इक्बाल, अपना सपना मनी मनी, ओम शांती ओम, गोलमाल 3, हाऊसफुल 2 अशा अनेक सिनेमांत काम करणारा मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) सध्या मोठ्या पडद्यापासून दूर आहे. क़रिअरमध्ये श्रेयसने अनेक सिनेमे केलेत. पण त्याला म्हणावे तसे यश मिळाले नाही. कारण काय? तर मित्रांनी केलेली दगाबाजी. होय, करिअरमधील अनेक धक्कादायक अनुभव त्याने शेअर केले आहेत.टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत श्रेयसने खासगी आयुष्यासोबत बॉलिवूडमधील करिअरबद्दल अनेक खुलासे केलेत. यातल्या काही खुलाशांनी चाहत्यांनाही धक्का बसला. (Shreyas Talpade on his career )

म्हणून सोलो सिनेमे चालले नाहीत...श्रेयसने अनेक सिनेमांत काम केले. काही सिनेमात त्याने लीड रोलही साकारला. पण इक्बाल वगळता त्याचे सोलो सिनेमे फार चालले नाहीत. यामागचे कारण त्याने या मुलाखतीत सांगितले. मी स्वत:चे मार्केटींग करू शकलो नाही. मी अनेक सोलो सिनेमांत काम केले. पण बहुतेक चालले नाही. माझ्या मते, माझ्यात एकच कमतरता होती. ती म्हणजे, मला स्वत:चे मार्केटींग करता आले नाही. माझ्या कामामुळे मला काम मिळेल, याच भावनेतून मी आत्तापर्यंत काम केले.

 मित्रांनीच पाठीत सुरा खुपसला...या मुलाखतीत श्रेयसने एक खळबळजनक खुलासा केला. त्याचा हा खुलासा ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या. तो म्हणाला, काही अभिनेत्यांना माझ्यासोबत काम करताना असुरक्षित वाटते, असं मला कळालंय. साहजिकच मी सिनेमात नसावं, असं त्यांना वाटतं. अनेक मित्रांसाठी, त्यांच्या हितासाठी मी सिनेमे केलेत. पण पुढे याच मित्रांनी माझ्या पाठीत सुरा खुपसला. अनेक मित्र मला मागे सोडून पुढे निघून गेलेत. आज ते सिनेमे बनवत आहेत. मला विचाराल तर इंडस्ट्रीत 90 टक्के लोक फक्त तुमच्या ओळखीचे असतात. केवळ 10 टक्के लोक तुमच्या कामामुळे मनापासून खुश होतात. इंडस्ट्रीत इगो खूप नाजूक गोष्ट आहे. कुणाचा अहंकार कधी व कसा दुखावेल, सांगता येत नाही. अमिताभ सारख्या महानायकाला त्याच्या करिअरमध्ये वाईट दिवस बघावे लागलेत, तर मी कोण आहे? प्रत्येक अभिनेता या टप्प्यातून जातो. पण अजूनही मी चांगल्या भुमिकांचा भुकेला आहे. अभिनय करतानाच मला मरण यावं, असं मला वाटतं, असेही तो म्हणाला.

 ‘इक्बाल’साठी लग्न लपवले‘इक्बाल’ हा श्रेयसचा गाजलेला सिनेमा. मात्र या सिनेमासाठी त्याला स्वत:चे लग्न लपवावे लागले होते. त्याने सांगितले, ‘इक्बाल’च्या शूटींगआधी मी 31 डिसेंबरला दिग्दर्शक नागेश कुकनूर यांना सुट्टी मागितली होती. त्यादिवशी नागेश एक पार्टी देणार होते आणि माझे त्याच दिवशी लग्न होते. पण मी लग्नाबद्दल सांगताच, लग्न कॅन्सल कर, असे नागेश मला म्हणाले. लग्नाच्या पत्रिका वाटल्या गेल्या होत्या. अशात माझ्यासारख्या मध्यमवर्गीय माणसाला ऐनवेळी लग्न कॅन्सल करायला सांगितल्यावर त्याची काय अवस्था होईल? मी खूप समजवल़े. फक्त एक दिवसाची सुट्टी द्या, या लग्नाबद्दल मी कोणालाही कळू देणार नाही, तेव्हा कुठे ते तयार झाले होते. मजेदार म्हणजे,  श्रेयसची पत्नी नागेश यांची बहीण बनून ‘इक्बाल’च्या प्रीमिअरला सहभागी झाली होती.

टॅग्स :श्रेयस तळपदे